कृष्णात चौगले/कोल्हापूर
`गोकुळ’च्या निवडणुकीसाठी ज्या दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना पात्र होण्यासाठी त्यांच्या संस्थेला विविध अटींची पुर्तता करावी लागणार आहे. नव्या सहकार कायद्यानुसार राज्यातील दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार आणि संबंधित दूध संस्थेने सहकार कायद्याच्या अटी व नियम पुर्ण केले असेल तरच ते निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत. सर्व निकष पुर्ण करणारे उमेदवारच पात्र ठरणार असल्यामुळे दोन्ही आघाडीतील इच्छूक उमेदवारांनी सोमवारी (5 एप्रिल) होणाऱया छाननी प्रक्रियेची धास्ती घेतली आहे.
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीसाठी तब्बल 488 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची करवीर प्रांत कार्यालयामध्ये सोमवारी छाननी होणार आहे. नवीन सहकार कायद्यानुसार उमेदवार पात्र ठरण्यासाठी अनेक नियम व अटी असल्यामुळे छाननीमध्ये कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार याकडे याकडे सर्वांचे लक्ष आहे. नव्या सहकार कायद्यानुसार प्राथमिक दूध सहकारी संस्थेने कायद्याच्या कलम 27 (3) ची पुर्तता करणे आवश्यक आहे. संचालक मंडळ निवडणूक ज्या सहकारी वर्षात होणार आहे, त्या वर्षाच्या मागील लगतपूर्व सलग तीन वर्षे क्रियाशील सभासदत्वाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच सलग्न सभासद संस्था दूध उत्पादकाची असल्याने त्या संस्थेने लगतच्या 31 मार्चला संपणाऱया अर्थिक वर्षासह मागील तीन अर्थिक वर्षात संघास प्रतिवर्षी 240 दिवस दूध पुरवठा करणे आवश्यक आहे. संकलन होणारे संपुर्ण दूध संघास पुरवठा केले असले पाहिजे. सभासद संस्था ऑडीट झालेल्या शेवटच्या वर्षी `अ’ अथवा `ब ‘ ऑडिट वर्गात असणे आवश्यक आहे. सभासद संस्थेच्या पंचकमिटीने आपल्या प्रतिनिधीला संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवण्याबाबत अधिकार दिल्याबद्दलचा ठराव तसेच दुसऱया कोणत्याही प्रतिनिधीला प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार दिलेला नाही अशा प्रकारचा ठराव संघाकडे सादर करणे आवश्यक आहे.
पात्रतेसाठी नियम व अटींची परीक्षा
संघ करीत असलेला किंवा या प्रकारचा कोणताही व्यवसाय स्वत: अगर भागीदारीत करीत नसला पाहिजे. तसेच निवडणुकीनंतर त्याचा हितसंबंध निर्माण झाला तर त्यास संचालक मंडळाचा सदस्य म्हणून पुढे राहता येणार नाही. त्या संस्थेचा संघाच्या कोणत्याही चालू खरेदी विक्रीच्या करारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष हितसंबंध गुंतला नसेल (संस्थेची संघातील स्वत:ची गुंतवणूक वगळता) तरच पात्र समजले जाईल. सलग्न संस्थेचा प्रतिनिधी लगतच्या 31 मार्च रोजी संलग्न संस्थेचा पंचकमिटी सदस्य असला पाहिजे. ज्या संलग्न संस्थेचा तो प्रतिनिधी असेल त्या संस्थेने पोट नियम क्रमांक 12 मधील जबाबदारी पार पाडली असली पाहिजे. संचालक मंडळाच्या निवडणुकीकरता नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱया कोणत्याही व्यक्तीस व संस्थेस त्याचे नाव मतदार यादीमध्ये असल्या खेरीज पात्र समजले जाणार नाही. संघाचे कोणत्याही प्रकारचे देणे अगोदरच्या तीन वर्षात लवादाकडून वसूल करण्यात आले नसले पाहिजे तसेच संघाचे कोणत्याही प्रकारचे देणे थकित नसले पाहिजे. संस्थेने आपल्या कर्तव्यात वारंवार कुचराई करणे, खोटी विधाने देऊन संघास फसविणे अगर संघाच्या इभ्रतीस नुकसान पोहचविणारे कृत्य केल्यास संचालक मंडळाच्या सभासत्वास पात्र समजले जाणार नाही. संस्थेच्या व्यवसायासंबंधी झालेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईनुसार ती अपात्र ठरली असेल किंवा अपात्र ठरविणारी कायदेशीर कारवाई त्या संस्थेवर झाली असेल अगर इतर कोणत्याही गुह्यात शिक्षा झाली असल्यास व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा 1960 कलम 85, 88 प्रमाणे जर तो संस्थेच्या जबाबदारीत येत असेल व कलम 146 प्रमाणे गुन्हेगार ठरले असेल तर पात्र समजले जाणार नाही. सलग्न संस्थेने मागील लगतच्या तीन वर्षात प्रतिवर्षी किमान 5 मे. टन संघाचे पशुखाद्य खरेदी केले असले पाहिजे. या सर्व नियम व अटी इच्छूक उमेदवाराच्या सभासद संस्थेने पुर्ण केल्या तरच संबंधित प्रतिनिधी संघाची संचालक मंडळाची निवडणूक लढवण्यास पात्र ठरणार आहे.