-गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी `तरुण भारत’ जवळ व्यक्त केला विश्वास
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात 35 वर्षाच्या दीर्घ काळानंतर सत्तांतर झाले. यादरम्यान घडलेल्या प्रत्येक घडामोडीसोबत नाव जोडले जात होते ते विश्वास नारायण पाटील तथा आबाजी यांचे. गोकुळमधील सत्तापरिवर्तनाचा लढा विजयाच्या टप्प्यावर नेण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली. त्यामुळे गोकुळच्या चाव्या त्यांच्या हातात सोपवून नेत्यांनी `विश्वास’ सार्थ ठरवला. मात्र आता त्यांची जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीपूर्वी आणि विजयानंतर केलेल्या घोषणांची पूर्तता करण्याची जबाबदारी त्यांचेवर आली आहे. या पार्श्वभूमीवर `तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत `गोकुळ राजकारण्यांचा नाही तर शेतकरी उद्धाराचा केंद्रबिंदू असेल’ हे ध्येये ठेवूनच वाटचाल असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रश्न:- गोकुळमध्ये अनावश्यक खर्चावर उधळपट्टी होते असा सातत्याने आरोप होत आहेत. हा नाजुक विषय कसा हाताळणार
आबाजी:-नक्कीच…! हा तर आमच्या अजेंड्यावरीलच मुद्दा आहे. गेली 35 वर्षाच्या कार्यकाळात दूध उत्पादकांच्या अहिताचा एकही निर्णय होऊ दिला नाही. त्यामुळे ठरावधारकांनी माझ्या वर पुन्हा विश्वास टाकला आहे. मी चुकीचं करणार नाही. अशी त्यांना खात्री आहे. सुत्रे स्वीकारलेल्या दिवसापासूनच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहे. सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र नक्की दुरुस्त करु, यातून जी बचत होणार आहे. त्यातील वाटा दूध उत्पादकांसह ग्राहकांना कसा होईल यावर भर देणार आहे. गोकुळचा मूळ पायाच हा दूध उत्पादक आहेत. त्यांना वाऱयावर सोडून संघाची की प्रगती कशी हाईल. कारकीर्दीत जे जे काही करीन ते दूध उत्पादकांसाठीच असेल. त्यांचे हीत जोपासले तरच संघ भरारी घेणार आहे. याची जानिव मला आहे.
प्रश्न:-चॉकलेट, मिल्क बार कोल्ड्रींक्स, मिल्कसेक आदी उपपदार्थ निर्मितीची क्षमता असूनही उदाशिनता आहे. या तुलनेत राष्ट्रीय पातळीरील अनेक संघ पुढे गेले आहेत. हे आव्हान कसे पेलणार?
आबाजी:-काळासोबत राहीलो तर आम्ही स्पर्धेत टिकणार आहोत. आतापर्यंत बटर मिल्क, दूध पावडरीच्या पुढे आम्ही विचार सुद्धा केला नाही. काही खासगी संघानी दुधापासुन भाकरवडीचा प्रयोग केला आहे. अशा पद्धतीने आम्हीही वेगवेळी उत्पादने बाजारात आणू शकतो. दुधापासून बेकरी उत्पादने मोठÎा प्रमाणात तयार करता येतात. गोकुळची क्षमता आहे. कुशल कर्मचारी वर्ग आहे. त्यांना आणखी थोडे ज्ञान देवून बाय प्रोडक्ट म्हणजे तुम्ही म्हणताय तसं चॉकलेट, मिल्कबार कोल्ड्रींक्स आदी उपउत्पादने बाजारात आणावी लागणार आहेत. नजिकच्या काळातच यावर गांभिर्याने विचार करुन ठोस पाऊल टाकणार आहे.
प्रश्न:- दूध वाहतूक टँकर आणि त्यातून होत असलेला भ्रष्टाचाराची आजपर्यंत फक्त चर्चाच होते. त्यानंतर मात्र काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. निवडणुकीत हाच मुद्दा गाजला आता पुढे काय?
आबाजी:- टँकरचा मुद्दा निवडणूक प्रचाराचाच एक भाग होता. नेत्यांनी यावर प्रचारदरम्यान भर दिला होता. आता त्याचा रिझल्ट देण्याची आमची जबाबदारीच आहे. ती कदापि टाळली जाणार नाही. मात्र आताच्या परिस्थितीला एकांगी विचार करुन चालणार नाही. यासाठी प्रथमत: सक्षम अशी पर्यायी व्यवस्था उभी करावी लागणार आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची चाचपणी सुरु आहे. सध्याच्या करारा पेक्षा कोणती कंपनी, ठेकेदार कमी दराने वाहतुक करण्यास तयार असेल तर तात्काळ निर्णय घेणार आहोत. सध्या कार्यालयीन वाहने यासह अन्य वाहतुकीवरली अतिरिक्त खर्च कमी करण्यास सुरवातही केली आहे.
(पूर्वार्ध:)