प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळमधून व्यापारी प्रवृत्तीला हद्दपार करुन मूळ मालक असलेल्या शेतकरी सभासदांच्या ताब्यात देण्यासाठी कटीबद्ध आहे. ज्यांनी 20 वर्षे संघ लुटला त्या महाडिकांशी चर्चा करण्याची गरज नाही, अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी शक्यता फेटाळली.
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही, तथापि सत्ताधारी अनेक संचालक आमच्याकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असेही पालकमंत्री सांगितले. दरम्यान आमदार विनय कोरे यांनी पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी स्वतंत्र भेट घेऊन गोकुळ निवडणूकीसंबधी चर्चा केली आहे.
25 वर्षाचे सोबती का सोडून जाताता ?
गोकुळच्या निवडणूकीसाठी ठराव गोळा करण्याची प्रक्रिया संपली असून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. माजी अध्यक्ष पाटील, डोंगळे आणि संस्थापक संचालक आणि माजी अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचा मुलगा शशिकांत पाटील यांनी सत्ताधारी आघाडीतील नेते आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी सवतासुभा मांडून बंड केले आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, गेली 25 ते 30 वर्षापासून ते महाडिक यांच्या सोबत आहेत. अशी मंडळी का सोडुन जात आहेत. याचे आत्मपरिक्षण त्यांनी करावे.
यंदा परिवर्तन अटळ
गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास अजून वेळ असून यावेळी गेल्यावेळप्रमाणे यंदा तगडे विरोधी पॅनेल उभे केले जाणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. यंदा परिवर्तन अटळ असून सत्ताधारी संचालक मंडळातील विरोधी पॅनेलमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार कोरेंनी घेतली मुश्रीफ, सतेज पाटलांची भेट
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपल्यानंतर सतेज पाटील आणि मुश्रीफ शासकीय विश्रामगृहावर गेले. त्याठिकाणी आमदार विनय कोरे यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भेट घेऊन स्वतंत्रपणे चर्चा केली. चर्चेत गोकुळबाबत चर्चा झाल्याचे समजते. कोरे यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा द्यावा, यासाठी सतेज पाटील यांनी विनंती केली. याबाबत कोरे यांना विचारले असता त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहता न आल्याने पालकमंत्र्याची भेट घेतल्याचे सांगितले. गोकुळबाबत त्यांना विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.
शेतकरी संघाच्या अध्यक्षांच्या सोमवारी राजीनामा
मुश्रीफ आणि कोरे यांच्यात शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. माने यांची मुदत संपली असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी सूचना मुश्रीफ यांनी कोरे यांच्याकडे केली. यावर कोरे यांनी माने यांच्या काळात संघात चांगले काम झाले आहे. मॅगनेट बजारची जागा ताब्यात घेतली. संघ नफ्यता आला. अमच्या काळात झालेल्या कामांचा विचार करावा असा ठोसही कोरे यांनी दिल्याचे समजते दरम्यान इच्छा असेल तर सोमवारीच माने राजीनामा देतील, असे कोरे यांनी मुश्रीफांना सांगितल्याचे कळते.