तातडीने दुरूस्तीची मागणी, – पुल सुरक्षित, वाहतूक धोकादायक
वार्ताहर/ राजापूर
गोठणे-दोनिवडे पंचक्रोशीतील पंधरा ते वीस गावांना जोडणाऱया अर्जुना नदीवरील पूलाच्या जोडरस्त्याचा मातीचा भराव पावसाळय़ाच्या शुभारंभाला खचला आहे. त्यामुळे पूलावरून प्रवास वा वाहतूक धोकादायक झाली आहे. या पुलाची तातडीने डागडूजी करावी अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागासह आमदार राजन साळवी यांनाही देण्यात आले.
पुलाच्या जोडरस्त्याचा मातीचा भराव खचला असला तरी, पूलाच्या बांधकामाला सद्यस्थितीमध्ये कोणताही धोका नाही. पावसाळय़ानंतर त्या ठिकाणी योग्यप्रकारची उपाययोजना वा बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयानी दिली. तर, आमदार राजन साळवी यांनी मोबाईलद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांशी संवाद साधून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
पावसाळय़ामध्ये अर्जुना नदीमुळे गोठणे-दोनिवडे पंचक्रोशीतील पंधरा ते वीस गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे गोठणेदोनिवडे-आंगले या ठिकाणी अर्जुना नदीवर पूल उभारावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून या भागातील लोकांकडून केली जात होती. लोकांची ही मागणी उचलून धरत या परिसरातील गावांच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने गठीत झालेल्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीने शासन दरबारी प्रयत्न केले. त्यासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्यावतीने शासनाकडे पत्रव्यवहार करून अर्जुना नदीवर पूल उभारण्याची मागणी केली. समितीच्या या मागणीला आमदार राजन साळवींसह माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही पाठबळ देत शासन दरबारी पूलाचा प्रश्न उचलून धरला.
साऱयांच्या प्रयत्नांना यश येताना पूलाच्या कामाला मंजूरीसह निधी उपलब्ध झाला. त्यातून, ग्रामीण पायाभूत विकास निधीतर्गंत उपलब्ध झालेल्या निधीतून अर्जुना नदीवरील पूलाचे बांधकाम झाले आहे. त्यातच, पूलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्यांचेही काम पूर्ण झाले असून पावसाळय़ानंतर या रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबूतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र, पावसाळय़ाच्या शुभारंभाला जोडरस्त्याचा मातीचा भराव काही ठिकाणी खचला आहे. तेथून प्रवास करणे सद्यस्थितीत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे सचिव विश्वास राघव, पदाधिकारी संदीप नाचणेकर, सुधीर विचारे, दिपक मोंडे, राजेंद्र बाईत आदींनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदार राजन साळवी यांना निवेदन दिले.