नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासह 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी भारतीय बॅडमिंटन संघटनेने भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे (आयओए) केली आहे. सॅन्तोसो (इंडोनेशिया), पार्क ते सँग (कोरिया) व मॅथियस बोए (डेन्मार्क) या विदेशी प्रशिक्षकांचा संघटनेने यात उल्लेख केला. याशिवाय, सुमांश सिवालंका व एव्हांजिलन हे दोन फिजिओ देखील पथकात असावेत, अशी संघटनेची अपेक्षा आहे.
‘यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमध्ये पदके जिंकण्याची अतिशय नामी संधी आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन, साहाय्य लाभावे, यासाठी 6 सदस्यांचे पथक सोबतीला असावे, अशी आमची मागणी आहे. गोपीचंद यांच्यासह एकूण 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन द्यावेत, असे आम्ही नमूद केले आहे’, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेतील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यजेती पीव्ही सिंधू, वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्य विजेता बी. साई प्रणित, जागतिक क्रमवारीतील दहावे मानांकित चिराग शेट्टी-सात्विकराज रणकिरेड्डी हे सध्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र आहेत. यंदाची ऑलिम्पिक सध्याच्या रुपरेषेप्रमाणे दि. 23 जुलैपासून सुरु होणे अपेक्षित आहे.
प्रशासकीय दिशानिर्देशाप्रमाणे ऑलिम्पिकसाठी प्रवास करणाऱया साहायक पथकातील सदस्यांची संख्या पात्र ऍथलिट्सच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक असू नये. मात्र, क्रीडा खाते सरकारवर खर्चाचा बोजा टाकला जाणार नाही, या अटीसह अशा ज्यादा सदस्यांना परवानगी देऊ शकते.
सध्या ऑलिम्पिकसाठी पीव्ही सिंधू ही पार्क यांच्या प्रशिक्षणाखाली हैदराबादमधील गचिबोली इनडोअर स्टेडियमवर सराव करत आहे तर प्रणितला सॅन्टोसो, चिराग-सात्विक यांना बोए यांचे प्रशिक्षण लाभत आहे. यामुळे, भारतीय बॅडमिंटन संघटनेने सर्वप्रथम या पात्र खेळाडूंची मते मागवली व त्यानंतरच भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर केला.
बॉक्स
तूर्तास, गोपीचंद टोकियोला जाण्यासाठी नाखुश
पुलेला गोपीचंद मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असताना भारताने लंडन व रिओ डी जानेरिओ ऑलिम्पिकमध्ये 1 रौप्य व 1 कांस्यपदकाची कमाई केली आहे. मात्र, यंदा गोपीचंद टोकियोला जाण्यास फारसे इच्छुक नाहीत, असे सध्याचे संकेत आहेत. जे खेळाडू पात्र ठरले आहेत, त्यांना आतापर्यंत जे प्रशिक्षक प्रशिक्षण देत आले आहेत, त्यांनीच ऑलिम्पिक दौऱयावर सोबत असणे योग्य ठरेल, असे ते मागील आठवडय़ात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.