प्रतिनिधी/ पणजी
सनबर्न आयोजकांच्या फायद्यासाठी प्रसंगी हे सरकार नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत गोव्यात कोरोनाबाधित तसेच मृतांची संख्याही कमी करून दाखवण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा संशय काँग्रेस पक्षाने व्यक्त केला असून काहीही झाले तरी गोव्यात यंदा कोणत्याही परिस्थितीत सनबर्न होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. सनबर्नचे आयोजन झाल्यास राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार माजेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
सनबर्न आयोजकांतर्फे शहरातील एका हॉटेलात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. निदर्शकांनी प्रारंभी सनबर्नचे अध्यक्ष हरिंद्र सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ती नाकारण्यात आली. त्यामुळे हॉटेलच्या गेटबाहेर निदर्शने करण्यात येऊन सनबर्न आयोजनास प्रखर विरोध करण्यात आला.
त्यावेळी संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडीस, वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या निदर्शकांना रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा आणण्यात आला होता.
कोरोनामुळे गत आठ महिन्यात गोमंतकीयांची किती वाईट परिस्थिती झाली याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे, काही जणांची तर स्वतःच्या कुटुंबाची दोन वेळची भूक भागविण्याचीही स्थिती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत गोव्यात सनबर्नचे आयोजन झाल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होऊन पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल याची 100 टक्के खात्री आहे, असे संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
कोरोना नियंत्रणात आणण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलेले असून भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार कोरोनाच्या नावानेसुद्धा राज्याची तिजोरी लुटत सुटले आहे. तरीही त्यांची भूक भागत नसल्यामुळे आता कुठे नियंत्रणात येत असलेला कोरोना पुन्हा एकदा वाढवून आणखीही लूट करायची आहे, असा दावा आमोणकर यांनी केला.
सनबर्न आयोजकांनी आतापासूनच जाहिरातबाजीस प्रारंभ केला असून गोमंतकीयांच्या प्रतिक्रियांचा कानोसा घेण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचीही मिलीभगत असून यांना गोमंतकीयांचे आरोग्य आणि भवितव्याबद्दल कोणतीही चिंता नाही, केवळ कमिशन हेच त्यांचे ध्येय असून त्यातूनच यापूर्वी पॅसिनो चालू करण्यास मान्यता देण्यात आली आणि आता सनबर्नच्या आयोजनास मान्यता देण्यात आली आहे, असा आरोप आमोणकर यांनी केला.
सनबर्नचे आयोजक हे तद्दन खोटारडे असून आतापर्यंत त्यांनी एकही गोष्ट खरी बोललेली नाही. ते येथे येतात आणि गोड बोलून, पैसे फेकून येथील राजकारण्यांना विकत घेतात, सनबर्नमुळे गोव्यात कुणालाही रोजगार, नोकरी मिळालेली नाही. केवळ 15-20 दिवस काम दिले म्हणून त्याला रोजगार दिला, पर्यटनास प्रोत्साहन दिले, असे म्हणता येणार नाही, या उलट ते कोटय़वधींची माया जमवून बॅगा घेऊन जातात, असे यावेळी सांगण्यात आले.
रुडाल्फ फर्नांडीस यांनीही सनबर्नच्या आयोजनास प्रखर विरोध दर्शविला. कोरोनाच्या नावाने सरकारने आतापर्यंत कोटय़वधींची लूट केलेली आहे. अशा परिस्थितीत आता कमी झालेली बाधितांची संख्या या सरकारला पुन्हा वाढवायची आहे. त्यामुळेच हजारो लोकांना एकत्र आणणाऱया सनबर्नसारख्या महोत्सवाच्या आयोजनास मान्यता देण्यात आली आहे. सनबर्न हा जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोहळा आहे. अशावेळी यंदा केवळ 10 हजारच लोक असतील हा आयोजकांचा दावा पूर्ण खोटा असल्याचे फर्नांडीस म्हणाले.
प्रत्येक वेळी हे सरकार सनबर्न आयोजकांना सशर्त मान्यताच देत असते. त्यातून ते तयारीस लागतात व शेवटच्या क्षणी विरोध वगैरे झाल्यास, आपण एवढी तयारी केलेली आहे, कोटय़वधींची नुकसानी होणार आहे, यासारखी कारणे पुढे करून केवळ सरकारकडूनच नव्हे तर न्यायालयाकडूनही मान्यता मिळवतात व काम साध्य करून घेतात, असे वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले. यंदाही त्यांची तोड डाव आहे. परंतु काहीही झाले तरी यंदा आम्ही हा महोत्सव होऊ देणार नाही, गोमंतकीयांच्या जीवावर उदार होऊन असा महोत्सव नको, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हार्दोळकर यांनी स्पष्ट केले.