प्रतिनिधी /पणजी
गोमंतक मराठा समाजाला 2022च्या निवडणूकीपूर्वी ओबीसीचा दर्जा देऊन 2013 पासूनची प्रलंबित मागणी पूर्ण करावी, असे निवेदन गोमंतक मराठा समाज संस्थेतर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना देण्यात आले. हे निवेदन समाजाचे अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण आस्कावकर, माजी अध्यक्ष नंदकिशोर शिरगावकर यांनी सुपूर्द केले.
निवेदनात म्हटले आहे की, गोमंतक मराठा समाजातर्फे 2013साली पहिल्यांदा सरकार दरबारी समाजाला ओबीसी दर्जा मिळावा म्हणून अर्ज केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी गोमंतक मराठा समाजाला ओबीसी दर्जा मिळाला काहीच हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते. विधानसभेतही काही आमदारांनी ओबीसी दर्जा द्यावा म्हणून जोरदार मागणी केली होती. त्यात दीपक प्रभू पाऊसकर, मायकल लोबो, दयानंद सोपटे यांचा समावेश होता. समाज कल्याण खात्याने सदर अर्ज ओबीसी आयोगाकडे सुपूर्द केल्यानंतर गोमंतक मराठा समाजाची इत्यंभूत माहिती गोळा करून पहिली सुनावणी घेतली होती. मात्र पर्रीकर यांच्या निधनानंतर ती प्रक्रिया रखडल्याचे निवेदनात म्हटले आहे. या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याच्या दृष्टीने ओबीसी दर्जा लवकरात लवकर मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.