सिंधुदुर्गात गोमय-मातीमिश्रीत मूर्तींची चळवळ रुजतेय : गोमय गणेश मूर्तींची पहिली शंभरची ऑर्डर होणार रवाना : मळगावचे विलास मळगावकर यांचा प्रयोग
भाग्यविधाता वारंग / झाराप:
आकर्षक, आखीव, रेखीव, सुबक, त्याहूनही अध्यात्मिक गंध असणाऱया, पाण्यात सहज विरघळणाऱया, वजनाला हलक्या ठरणाऱया व महत्त्वाचे म्हणजे प्लास्टर पॅरिसला सक्षम पर्याय निर्माण करणाऱया गोमय गणेशमूर्ती सिंधुदुर्गात प्रथमच तयार झाल्या असून जिल्हय़ाच्या सीमा ओलांडून बाहेर जाण्यास सज्जही होत आहेत.
गणपतीसाठी वापरण्यात येणारी ‘शाडू’ माती संपुष्टात येत आहे. आयात होणारे मातीचे गोळेही महाग बनत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणाला घातक आहे. एकूणच या सर्वाला सक्षम पर्यावरणस्नेही पर्याय आता सिंधुदुर्गात मूळ धरु लागला आहे. मळगाव-सावंतवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक विलास मळगावकर यांनी ‘गोमय’ व साधी माती यांच्या मिश्रणातून आकर्षक गणेश मूर्ती बनविल्या असून पुणे, मुंबई येथे शंभर मूर्तींची ऑर्डर रवाना होणार आहे.
वैदिक काळापासून गाईला महत्वाचे स्थान आहे. प्राचीन संस्कृतीतही गाय साऱया संपत्तीचे भांडार असल्याचे नमूद आहे. गोमय (गाईचे शेण), गोमूत्र, गाईचे दूध, दही, तूप यांचे मिश्रण म्हणजे ‘पंचगव्य’ हे प्रसिद्ध आहे. सणावारासाठी गायीच्या शेणाने सारवलेली जमीन व त्यावरची रांगोळी ही पूर्वंपार संस्कृती आजही टिकून आहे. गीर जातीचे गोमय व साधी माती यांच्या मिश्रणातून बाप्पांच्या कलात्मक मूर्तीही आता सिंधुदुर्गात साकारत आहेत.
नॅनो टेक्नॉलॉजी
अगदी सहा इंचापासून ते साडेतीन फुटापर्यंतच्या आल्हाददायक, सुबक, रेखीव गोमय मूर्ती मळगावकर यांनी आपल्या मळगावच्या गणपती शाळेत बनविल्या आहेत. साधारण बाराशे ग्रॅम वजनापासून पुढे या मूर्ती आहेत. पारंपरिक मूर्तींपेक्षा गोमय मूर्तींचे वजन दोन तृतियांशने कमी भरते. एका इंचाला सुमारे शंभर रुपये याप्रमाणे मूर्तींचा दर ठरतो.
गोमय व माती यांच्या निम्म्या-निम्म्या मिश्रणातून या मूर्ती साकारल्या आहेत. विशेष म्हणजे स्थानिक माती चाळून, नीट करून वापरली जाते. गोमयमधील ‘फायबर’ एकूणच मिश्रण एकत्र घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात.
मिश्रणापासून मूर्ती तयार झाल्यावर उजळपणा व चकाकी येण्यासाठी गोमयचा स्प्रे फवारला जातो. पावसाळय़ातील गोमय विशेषतः चमकदार असते. त्यानंतर मूर्तीवर विशिष्ट ठिकाणी गंधाचे ठिपके दिले जातात. त्यामुळे मूर्ती नैसर्गिक व आकर्षक दिसते. अशाच मूर्तींना मुंबई व पुणे येथून मागणी असून शंभर मूर्ती विशिष्ट अशा जाड पुठ्ठय़ाच्या बॉक्समधून लवकरच रवाना होणार आहेत. पॅकिंगसाठी बॉक्समध्ये कोकोपिट वापरतो, असे मळगावकर म्हणाले.
गोमय वसते लक्ष्मी
इतर गोमयपेक्षा व त्यातही गीर जातीचे गोमय मूर्ती बनविण्यासाठी वापरले जाते. हे गोमय अधिक मुलायम आहे. त्यात चमकही आहे. याला विशिष्ट गंधही आहे. गो-पालन वाढावे, हाही हेतू यामध्ये असून ‘गोमय वसते लक्ष्मी’ हे अधिष्ठानही यामागे आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हय़ातील पहिला प्रयोग
उत्तरप्रदेश, बिहार, पुणे येथे केवळ गोमयचे पीठ करून गणपती बनविण्याची पद्धत आहे. या मूर्तीही लहान असतात. सिंधुदुर्गात गोमय व माती यांच्या मिश्रणाचा हा पहिला प्रयोग असल्याचे मळगावकर म्हणाले.
मळगावकर यांची प्रयोगशीलता
विलास मळगावकर बिबवणे हायस्कूलमधून सेवानिवृत्त झाले. सेवेत असताना त्यांचा कला क्षेत्रात विशेष वावर असायचा. गेली अनेक वर्षे ते गणपती बनवतात. निवृत्तीनंतर त्यांनी विशेष पर्यावरण पूरक काम सुरू केले. कागदी लगदा, रेवा माती व गोमय आदी प्रयोग सुरू होते. त्यांनी बनविलेल्या कागदी लगद्याच्या मूर्ती परदेशातही गेल्या. सैद्धांतिक विचारातून त्यांनी गीर गोमयला पाच रुपये प्रति किलो असा दरही ठरवला. यावषी गोमय व साधी माती यांच्यापासून त्यांनी मूर्ती बनविल्या. याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करीत प्रथमच गोमय मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली. भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची प्रेरणा मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात.
सिंधुदुर्गातील अशीही चळवळ
शाडूच्या मातीची कमतरता, बाहेरून आयात होणारी पण न परवडणारी माती, ‘पीओपी’चे संकट अशा समस्यांना तोंड देता यावे म्हणून गणेश मूर्तिकार संघ, झाराप येथील भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्यावतीने कागदी लगद्यापासून मूर्ती बनविण्याची प्रशिक्षणे झाली. एप्रिल महिन्यात लुपिन फाऊंडेशनमार्फत गोमय मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण वैभववाडीतील महेश संसारे यांच्या गो-शाळेत झाले. एकूणच या चळवळीतून गोमय मूर्ती यावषी जिल्हय़ाच्या सीमा ओलांडत आहेत, हे विशेष आहे.
डॉ. देवधर यांनी व्हीडिओ पाठवला अन्..
विलास मळगावकर यांना भगिरथचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी गोमयपासून बनणारे फ्लावरपॉट, कुंडी आदींचा एक व्हीडिओ पाठवला. त्यावरूनच मळगावकर यांनी प्रेरणा घेत गोमय मूर्ती साकारण्याचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी त्यांनी विचारमंथन करून शोधमोहीम राबवली. पुणे येथील दातार यांच्याशी चर्चा केली, असेही मळगावकर यांनी आवर्जून सांगितले.
गोमय मूर्तींची जिल्हय़ात वर्षभर इंडस्ट्री बनावी!
बाहेरच्या ठिकाणी गणपती मूर्ती बनविण्याचे काम वर्षभर चालते. सिंधुदुर्गातील कलाकार त्यामध्ये अधिक संख्येने असतात. जिल्हय़ात गणपती शाळांमध्ये तीन-चार महिने काम चालते. यामुळे कलाकारांची धावपळ उडते. कामगारही मिळत नाहीत. त्यामुळे या शाळा वर्षभर उघडय़ा ठेवून आपले काम सांभाळत मूर्तिकारांनी सांघिक बळावर पर्यावरण पूरक आधुनिकता जोपासल्यास जिल्हय़ातही वर्षभर चालणारी गणपती इंडस्ट्री तयार होऊ शकते. जिल्हय़ात प्रशिक्षण, प्रसिद्धी, कलादालन याचीही यानिमित्ताने गरज निर्माण होणार आहे. या उपक्रमाचे राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीनेही स्वागत करण्यात येत आहे.