मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. जनआशीर्वाद यात्रेवेळी राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला अभिवादन केले होते. यांनतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांवर हल्लाबोल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे यांनी स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण करण्यापेक्षा मन शुद्ध ठेवा, असा खोचक टोला लगावला होता. आता पुन्हा स्मृतीस्थळाचे शुद्धिकरणावरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत जनआशीर्वाद यात्रा ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली”, असं ते म्हणाले. दुसरीकडे नारायण राणे यांनी राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तर गोमूत्र शिंपडण्यावरून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना राणे यांनी “वीज पुरवठा नाही राज्यात म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. मी प्रयत्न करणार, इथल्या मंत्र्यांशीही बोलणार. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार आज बेरोजगार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहिती नाही. गोमूत्र शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा.” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.