तणाव निर्माण झाल्याने पोलिसांची कारवाई रामराव वाघसह 16 जणांना घेतले ताब्यात सशर्थ जामीनावर सुटका
प्रतिनिधी /पणजी
बांबोळी येथील गोमेकॉच्या गेट बाहेर फळे, भाजी, फुले विक्रेत्यांना हटविल्याने तणाव निर्माण झाला होता. तीसवाडी तालुका मामलेदार राहुल देसाई यांनी विक्रेत्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आगशी पोलिसांनी विक्रेत्यांचे नेतृत्व करणारे रामराव वाघ, रामा काणकोणकर यांच्यासह 16 जणांना ताब्यात घेतले. नंतर सशर्थ जामीनावर सुटका केली.
गोमेकॉच्या बाहेर ज्या जागेत विक्रेते बसतात ती जागा स्वयम रोजगार अंतर्गत दिनदयाळ गाडे घालण्यासाठी आरक्षीत करण्यात आली आहे. त्यामुळे सदर जागा खाली करण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जागा खाली करण्यासाठी पोलीस फौजफाटय़ासह मामलेदार आले असता विक्रेत्यांनी जागा खाली करण्यास हरकत घेतली. बाचाबाची वाढत गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा पोलासंनी कारवाई करून विक्रेत्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या विक्रेत्यांमध्ये लता पिल्लमार (44 बांबोळी), लिना शिरोडकर (41 कुडका), वासूदेव शिरोडकर (कुडका 50), समिरा शिरोडकर (42 कुडका), अनुसया खांडेपारकर (75 बांबोळी), हर्षा गवस (42 शिरदोण), पुष्पा कुट्टीकर (42 ओडशेल), लक्ष्मी प्रसाद (50 बेती), सुनिता काणकोणकर (50 नावशी बांबोळी), प्रेमा माशेलकर (55 कुडका), लक्ष्मी रंगय्या (62 बांबोळी), रेश्मा काणकोणकर (42 बांबोळी), गुरुदास दिवेकर (70 बांबोळी), रामा काणकोणकर (35 कुडका), रामराव वाघ (54 डोंगरी) भारत माशेलकर (32 कुडका)
गोमेकॉच्या गेट बाहेर असलेले 30हुन अधिक गाडे काही महिन्यापूर्वी सरकारने हटविले होते. नंतर त्यांना नव्याने गाडय़ांचे बांधकाम करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान गोमेकॉच्या गेट बाहेर उघडय़ावर फळे, भाजी फुले विक्रेत्यांनाही हटविण्यात आले होते. नंतर विक्रेत्यांना तात्पूरती जागा देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गाडे उभारण्याचे काम सुरु झाल्याने फळे, भाजी, फुले विक्रेत्यांना दुसऱया ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. तिसवाडी मामलेदारांनी विक्रेत्यांना दुसऱया ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न केला असता विक्रेत्यांना जागा सोडण्यास हरकत घेतली आहे.
काही महिन्यापूर्वी ज्यांचे गाडे हटविण्यात आले होते. त्यांचे पुनरावसन करण्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. ज्या विक्रेत्यांना तात्पूरती जागा देण्यात आली होती त्यांचा पुनरवसन कामात अडथळा निर्माण होणार काय. याबाबत विचारणा करण्यासाठी गाडे धारकांनी सांताक्रूझ आमदार टोनी फार्नांडिस यांची भेट घेतली. गाडेकरांसाठी केलेला प्लान सरकारने न्यायालयासमोर ठेवावा तसेच उच्च न्यायालयात फेरविचार याचीका सादर करावी असे आमदार टोनी यांनी सांगितले.