मामाने केला घातपाताचा संशय व्यक्त : म्हणाले, खात्यातील काहीजण देत होते त्रास!
वार्ताहर / कट्टा:
मालवण तालुका कृषी अधिकाऱयांच्या अखत्यारीत कार्यरत गोळवण कृषी सहाय्यक विशाल बाळासाहेब हांगे (27, मूळ राहणार बुलढाणा लोणार, कामानिमित्त राहणार कट्टा) यांनी केंद्रशाळा कट्टा नं 1 नजीक अमोल साळवी यांच्या इमारतीत भाडय़ाने राहत असलेल्या खोलीमध्ये पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 29 मे रोजी सकाळी उघडकीस आली.
हांगे यांच्यासोबत राहणारे सहकारी साळेल कृषी सहाय्यक विजय कांबळे यांनी पोलिसांना खबर दिली. हांगे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु ही आत्महत्या कामाचा ताण जास्त असल्याने केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हांगे आणि विजय कांबळे हे कट्टा येथील साळवी यांच्या इमारतीत टू रुम किचन खोलीत एकत्र भाडय़ाने राहत. शुक्रवारी रात्री दोघांनी एकत्र जेवण करून गप्पागोष्टी केल्या व दोघेही आपापल्या रुममध्ये झोपण्यास गेले होते. मात्र सकाळी हांगे यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देताच हेड कॉन्स्टेबल रुक्मांगद मुंढे, कॉन्स्टेबल योगेश सराफदार, संतोष पुटवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना दिली. त्यांनीही देखील घटनास्थळी भेट दिली. डीवायएसपी डॉ. नितीन कटेकर हेही घटनास्थळी दाखल झाले होते.
घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
दरम्यान, हांगे यांचे मामा रामा घुले यांनी आपल्या भाच्याने आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. कारण त्याला कामाचा ताण जास्त होता. तसेच त्याच्याच खात्यातील काही लोक त्याला बरेच दिवस त्रास देत होते. याबाबत त्याने आपणास सांगितले होते, असे सांगितले. तसेच या विषयावर आपले भाच्यासोबत शुक्रवारी रात्री मोबाईल फोनवरून बोलणे झाले होते. त्यावेळी त्याने खात्यातील काही लोकांची नावे सांगितली, अशी माहिती पोलिसांना दिली. तो बराच मानसिक तणावाखाली होता. त्यामुळे ही आत्महत्या नसून हा घातपात असल्याचा संशय घुले यांनी व्यक्त केला व आपण घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह खाली उतरवू नये, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई केली.
चिठ्ठीत अनेकांची नावे नमूद
विशाल हांगे यांचे नातेवाईक आल्यानंतर रुमचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी हांगे यांनी आई-वडिलांसाठी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी आपल्याला त्रास देणाऱया कृषी खात्यातील काहीजण आणि स्थानिक पातळीवरील काही व्यक्तींची नावे लिहून ठेवली होती. त्यामुळे पुढील तपास आणि मृत्यूचे नेमके कारण याचा उलगडा त्या चिठ्ठीतून होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विशालने चिट्ठी लिहून ठेवल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.