डॉ. कौस्तुभ प्रियोळकर यांचे प्रतिपादन : ‘गोवा मुक्तीसंग्राम आणि मराठी साहित्य’विषयावर पेडणेत एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद
प्रतिनिधी /पेडणे
गोवामुक्ती संग्रामाचा संघर्षमय इतिहास आणि त्यावर आधारित साहित्यकृतींच्या अभ्यासात युवकांचा सक्रिय सहभाग प्रशंसनीय आहे. क्रांतिवीरांनी आपले सर्वस्व समर्पित करून गोमंतकाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्याप्रती कृतज्ञभाव प्रत्येकाच्या मनात असायला हवा. राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमांतून क्रांतिवीरांच्या शौर्य पराक्रमाचा परिचय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन डॉ. कौस्तुभ प्रियोळकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि गोवामुक्ती षष्टय़ाब्दीचे औचित्य साधून गोवा मराठी अकादमी, गोवा सरकार आणि मराठी विभाग, संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘गोवा मुक्तिसंग्राम आणि मराठी साहित्य’ या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवाद संत सोहिरोबानाथ महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी डॉ. तुषार अनवेकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, निवृत्त नौदल सैनिक अनिल बोंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्ज, डॉ. विनय मडगावकर, मराठी विभाग प्रमुख तथा परिसंवाद संयोजक डॉ. नीता तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. फिलीप रॉड्रिग्ज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्रा. अनिल सामंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार अनवेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. कौस्तुभ प्रियोळकर यांच्या हस्ते निवृत्त नौदल सैनिक अनिल बोंदे यांचा सत्कार करण्यात आला. गोव्यातील विविध ठिकाणचे सैनिकही या परिसंवादास उपस्थित होते. उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा धोंड यांनी केले तर डॉ. नीता तोरणे यांनी आभार मानले.
प्रथम सत्रात गोवा विद्यापीठातील मराठी विभागाच्या डॉ. विनय मडगावकर यांनी बीज निबंधपर भाषण केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. नवसो परब यांनी केले तर कु. उन्नती नारुलकर यांनी आभार व्यक्त केले.
राणी चनम्मा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोवा मुक्ती संग्राम आणि मराठी कविता’ या विषयावर दुसरे सत्र घेण्यात आले. डॉ. नीता तोरणे यांनी गजानन रायकर यांच्या कवितेतील राष्ट्रीयवाद यावर भाष्य केले. डॉ. वृंदा केळकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘गोमंतक’ या रचनेवर विवेचन केले. बोरकरांच्या कवितेतून क्रांती कशाप्रकारे आविष्कृत झालेली आहे, याबाबत प्रा. तृप्ती फळदेसाई यांनी सांगितले. जीवनमुक्त महाराजांनी आपल्या अभंगातून समाज प्रबोधन करत लोकांच्या मनात राष्ट्रभक्ती कशाप्रकारे निर्माण केली. याबाबत फळदेसाई यांनी विवेचन केले. या सत्राचे सूत्रसंचालन रोहन तांबोस्कर याने केले तर शामली परब हिने आभार व्यक्त केले.
डॉ. गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोवा मुक्तिसंग्राम संस्मरणीय साहित्य’ हे दुसरे समांतर सत्र घेण्यात आले. डॉ. गीता येर्लेकर यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रशक्ती आणि मुक्तिवाद डोळय़ांसमोर ठेवून आझाद गोमंतक दलाच्या कार्याचा विविध कादंबरीच्या आधारे माहिती पुरविली. प्रा. सारिका आडविलकर यांनी भारतकार हेगडे देसाईचे क्रांतिकारी अग्रलेख यावर माहिती दिली. प्रा. पूर्वा वस्त यांनी गोवामुक्ती संग्रामावर आधारित कादंबरीचा परामर्श घेतला. प्रा. स्नेहा देसाई यांनी मराठी साहित्याद्वारे गोवा मुक्तीसंग्रामात ख्रिस्ती बांधवांचे योगदान नमूद केले. मानसी वाळवे यांनी गजानन रायकर लिखित ‘स्वातंत्र्य लढय़ातील काही आठवणी’ या पुस्तकाच्या आधारे क्रांतिवीरांच्या कुटुंबियांनादेखील कशाप्रकारे त्रास सहन करावा लागायचा याबाबत विवेचन केले. प्रणाली सूर्लकर यांनी गोवा मुक्तिसंग्रामवर आधारित ‘जळता गोमंतक’ या नाटकावर भाष्य केले. या सत्राचे सूत्रसंचालन स्नेहा गावडे यांनी केले तर श्रद्धा काळसेकर यांनी आभार मानले.
डॉ. विनय मडगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोवा मुक्ती संग्राम आणि आत्मचरित्रात्मक लेखन’ हे तिसरे सत्र झाले. पत्रकार परेश प्रभू यांनी मनोहर हिरबा सरदेसाई यांच्या चिकित्सामक इतिहासाचे वर्णन केले. प्रा. राधिका नागवेकर यांनी प्रभाकर सिनारी यांचे आत्मनिवेदन अंधाराकडून प्रकाशाकडे याचा परामर्श घेतला. प्रा. आनंद कोळंबकर यांनी पा. पू. शिरोडकर लिखित ‘आठवणी माझ्या कारावासाच्या काळया निळय़ा पाण्याच्या’ या आत्मचरित्रावर भाष्य केले. प्रा. नवीन परब यांनी गोवामुक्तीसाठी मोहन रानडे यांनी घेतलेले वचन कशाप्रकारे निभावले याचा आढावा त्यांचे आत्मचरित्र सतीचे वाण या द्वारा घेतला. प्रा. अंजली नाईक यांनी प्रभाकर वैद्य लिखित ‘अग्नीच्या ज्वाळा’ या आत्मचरित्रावर बोलताना सशस्त्र हल्ला, आझाद गोमंतक दल, भूमिगत चळवळी आदींवर भाष्य केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रणाली सावंत यांनी केले तर अंकिता गावस यांनी आभार मानले.
समारोपाच्या सत्रात परिसंवादाचे निरीक्षक प्रा. विनायक बापट यांनी सर्व शोधनिबंधावर विचार करून व्यक्त आपली निरीक्षणे नोंदवली. प्रा. अनिल सामंत यांनी आयोजक या नात्याने आपले मनोगत व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन
प्रा. अंजली नाईक यांनी केले तर डॉ. नीता तोरणे यांनी आभार मानले.