प्रतिनिधी /बेळगाव
सतत पडणाऱया पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले असून काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. येथील गोवावेस बसवेश्वर सर्कलमध्ये पावसाचे पाणी साचले असून ते वाहून जाण्यास जागा उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झालेली आहे.
येथील सर्कलमध्ये बसस्टॅण्डच्या समोरच पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस स्टॅण्डमध्ये उभे राहणे मुश्कील बनले आहे. येथील पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रवाशांसोबतच वाहनधारकांचीही डोकेदुखी वाढली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरून ये-जा करणे कठीण बनले असून एखादे वाहन जोराने गेल्यास प्रवाशांच्या आणि वाहनधारकांच्या अंगावर पाणी उडत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी वाट उपलब्ध करून द्यावी आणि यापुढे सदर मार्गावर पुन्हा पाणी साचून राहणार नाही यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी आणि वाहनधारकांनी केली आहे.