वाहन चालकांमधून तीव्र संताप, गोवा सरकारने लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
चोर्ला घाटातून गोव्याला जाणा- येणाऱया वाहन चालकांना गोवा पोलिसांकडून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. गाडीची कागदपत्रे असतानाही चौकशी करून या ना त्या कारणाने भरमसाठ दंड आकारणी केली जात आहे. यामुळे बेळगावचे प्रवासी संतप्त झाले असून गोवा सरकारची व गृह खात्याची प्रतिमा मलिन केली जात असल्याने असे प्रकार तात्काळ थांबविण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत.
कर्नाटक पासिंगचे वाहन चोर्ला घाटातून गोव्याच्या हद्दीत प्रवेश करताच गोवा पोलिस ते थांबविले जात आहे. गोव्यावरून येताना वाहन चालकांना थांबवून तुम्ही मद्यप्राशन केले असून तुमच्यावर दंड घालण्यात येईल, गाडीची कागदपत्रे अर्धवट आहेत अशी कारणे देत लूट करण्याचा प्रयत्न होत आहे. असे प्रकार वारंवार घडू लागल्याने बेळगावमधील वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बेळगाव व गोवा यांचा पर्यटन, व्यापार, संस्कृती यामुळे जवळचा संबंध आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहने बेळगाव- गोवा असा प्रवास करीत असतात. पर्यटनदृष्टय़ा गोवा समृद्ध असल्याने बेळगाव तसेच परिसरातील पर्यटन गोव्याला जातात. परंतु या पर्यटकांना पोलिसांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावरही होणार आहे. तसेच अशा प्रकारामुळे गोवा पोलिसांची प्रतिमा मलिन होत असून हे प्रकार थांबविण्याची मागणी होत आहे.
चोरीच्या मार्गाने होणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून वाहन तपासणी करणे योग्य आहे. परंतु कुटुंबासमवेत असतानाही वाहनचालकांना उतरवून चौकशी करणे कितपत योग्य आहे. दोन दिवसांपूर्वी एका कुटुंबासमवेत गोव्यावरून येणाऱया वाहनचालकासोबत असाच प्रकार घडला. अखेर त्यांनी गोवा पोलिस दलातील आपल्या नातलगाला फोन केल्यानंतर ते वाहन सोडण्यात आले. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार बंद करण्याची मागणी होत आहे.