पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांची माहिती : भाजपशी कोणतेही संबंध ठेवणार नाही
प्रतिनिधी / पणजी
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर गोवा फॉरवर्डने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देऊन आम्ही एनडीएतून बाहेर पडत आहोत, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिली. त्याचबरोबर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हरविणे हे एकमेव ध्येय ठेवणाऱया कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्याची आमची तयारी असेल, असेही त्यांनी जाहीर केले.
काल मंगळवारी पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर, आमदार जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांची उपस्थिती होती. गोवा फॉरवर्डचे यापुढे भाजपशी कोणतेही संबंध राहणार नाहीत, त्यामुळेच एनडीएतून बाहेर पडत असल्याचे पत्र केंद्रीय गृहमंत्री तथा एनडीएचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठविण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
पक्ष कार्यकारिणीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी फॉरवर्डसाठी ही नवीन सुरुवात असून गोवा पुढे नेण्याचे ध्येय बाळगणाऱया आमच्या प्रत्येक सहकाऱयासाठीही नवी राजकीय सुरुवात असल्याचे सरदेसाई म्हणाले.
नव्या पक्षाशी संबंध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न
एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यास एवढा कालावधी का लावला? असे विचारले असता, त्यांनी सांगितले की प्रत्यक्षात जुलै 2019 पासूनच एनडीएकडील आमचे संबंध संपले होते. परंतु आम्ही अन्य समविचारी पक्षाशी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होतो. सध्या मडगाव पालिका निवडणुकीत आम्ही विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासोबत असून ही युती योग्य की अयोग्य ते मतदार ठरवतील व त्याची पोचपावती 26 एप्रिल रोजी निवडणुकीच्या निकालातून मिळेल.
सावंत यांचे सरकार उद्योजकांचे अन् गोवाविरोधी
मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना आम्ही भाजपसोबत गेलो होतो. त्यावेळी भाजपची धोरणे गोव्यासाठी पोषक होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची धोरणे बदलली. सध्याचा भाजप हा गोवाविरोधी आहे. या सरकारने कोळसा कंपनीस गोवा विकायला काढला आहे. मुख्यमंत्री स्वतः बडय़ा उद्योजकांचे एजन्ट बनल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्या हातातून गोवा वाचवण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रसंगी कोणताही अहंकार न बाळगता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याशी बोलण्याससुद्धा आपण तयार आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
2019 मध्येच आमचे रालोआकडील संबंध संपले होते. त्यामुळेच म्हादई, कोळसा, मोले रेल्वे दुपदरीकरण, बेरोजगारी, कोविड गैरव्यवस्थापन या साऱया प्रश्नांवर आम्ही वेळोवेळी सरकारला धारेवर धरले होते, असे सरदेसाई यांनी सांगितले. विद्यमान कर्तृत्वहीन सरकारमुळे मागील दोन वर्षे आम जनता भरडत आहे. गैरव्यवस्थापनामुळे राज्य आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले. गुन्हेगारी वाढली. ब्रष्टाचार शिगेला पोहोचला. ज्या रेल्वे प्रकल्पाला मनोहर पर्रीकर यांनी विरोध केला होता, त्याच प्रकल्पातून झटपट पैसे कमावता येतात हे दिसून आल्यावर या सरकारने मान्यता दिली. या सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाही तत्वेही तुडवली आहेत. अशा भाजपशी आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही, अशी शपथ आम्ही बोडगेश्वराला साक्ष ठेऊन घेतली आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
या सरकारच्या या सर्व गोवाविरोधी धोरणांना रोखण्यासाठी सर्व राजकीय विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठीच राजकारणी आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन टीम गोवा ही संकल्पना पुढे नेण्याची गरज सरदेसाई यांनी व्यक्त केली. राज्यातील वेगवेगळ्या चळवळीतील नेते आणि एनजीओंनी या संकल्पनेस पाठिंबा दिल्याचे सांगून आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे सरदेसाई म्हणाले.