प्रतिनिधी/ वास्को
पर्यावरण संवर्धन आणि गोवा बचाव असा संदेश देत मोलेहून वास्कोकडे निघालेली शांती पदयात्रा शुक्रवारी संध्याकाळी वास्को शहरात दाखल झाली. शहरात पदयात्रेतील नेत्यांनी या यात्रेचा उद्देश सफल झाल्याचे सांगून ही सुरवात आहे. वेळ पडल्यास पुन्हा रस्त्यावर येऊ असा इशारा सरकारला दिला. मुरगाव बंदराच्या धक्क्याजवळ पदयात्रेची सांगता करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी मोलेहून प्रारंभ झालेली ही शांती पदयात्रा फोंडा व लोटली, कुठ्ठाळी, सांकवाळ, चिखलीमार्गे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वास्को शहरात दाखल झाली. यात्रेत मोठय़ा संख्येने लोक सहभागी झाले होते. रेल्वे मार्ग दुपदरीकरण, महामार्गाचे रूंदीकरण, संरक्षित जंगलक्षेत्रातून 400 केव्ही वीजवाहिन्या, या प्रकल्पांसाठी नष्ट करावी लागणारी वनराई तसेच गोव्यात कोळसा आयात करण्याला विरोध, अशा हेतूने या पदयात्रेचे आयोजन गोंयचो आवाज, गोंयचो एकवोट या संघटनांनी केले होते.
कामत, चोडणकर, आलेक्स यांचा सहभाग
या पदयात्रेला चांगला प्रतिसाद लाभल्याचे या यात्रेतील लोकांनी वास्कोत दाखल होताच सांगितले. सांकवाळ कुठ्ठाळी या ठिकाणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनीही यात्रेत सहभाग घेतला. चिखली ते वास्को दरम्यान या यात्रेत आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स सहभागी झाले होते. या यात्रे दरम्यान प्रत्येक पंचायत क्षेत्रातून नागरिक सहभागी झाले. त्यांनी शांती यात्रेच्या उद्देशाचे समर्थन केल्याचे आयोजिकांनी सांगितले.
आमदार आल्मेदा यांना निवेदन सादर
वास्कोत दाखल झाल्यावर यात्रेतील कार्यकर्त्यांनी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांना गोंयचो एकवोट व गोंयचो आवाज यांच्यातर्फे पर्यावरण नाशाला विरोध करतानाच गोवा वाचवण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यानंतर वास्को शहरातील जोशी चौकात स्वप्नेश शेर्लेकर व इतरांनी यात्रेतील सहभागींना मार्गदर्शन केले.
मोलेपासून वास्कोपर्यंत अनेकांचा पदयात्रेत सहभाग
मोलेपासून वास्कोपर्यंत ठिकठिकाणी लोकांनी यात्रेत सहभागी होऊन गोवा वाचवण्यासाठी जागृत असल्याचे दाखवून दिले. गोव्याच्या नाशाविरूध्द लोक आता बाहेर पडू लागलेले आहेत. त्यामुळे सरकारने लोकांना गृहीत धरू नये. सरकारला लोक योग्य काय ते वेळ आल्यास दाखवून देतील. पुढच्या पिढीसाठी गोवा आम्हाला राखून ठेवायला हवा. याची जाणीव लोकांना झालेली असल्याने गोव्यातील लोक गोवा वाचवण्यासाठी एकत्र आहोत, याचा संदेश या शांती यात्रेतून देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शहरातील एमपीटीच्या गेटजवळ या यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी गोवा फांऊडेशनचे क्लाऊड आल्वारीस, मच्छीमार नेते ओलान्सीयो सिमोईस यांनी मार्गदर्शन केले व यात्रेची सांगता करण्यात आली. कॅप्टन वॅरीयातो फर्नांडिस, चिखलीच्या चर्चचे फादर परेरा यावेळी उपस्थित होते.