गत तीन वर्षांपासून एकही रॅबिजबळी नाही : श्वान लसीकरण प्रभावी मोहिमेचे फलित
प्रतिनिधी /पणजी
गोवा हे ’रॅबिजमुक्त राज्य’ असल्याची घोषणा सरकारने केली असून अशाप्रकारे अधिसूचित होणारे ते देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या मनातून श्वानासंबंधी भीती दूर होईल, तसेच प्राणीसंवर्धनास चालना मिळेल आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनास वाव मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
वर्ष 2014 मध्ये राज्यात रॅबिजमुळे 17 लोकांचे बळी गेले होते. त्यानंतर ’मिशन रॅबिज प्रॉजेक्ट’ची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचा परिणामस्वरुप गेल्या तीन वर्षात राज्यात रॅबिजमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही हा गोव्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. अशी अभिमानास्पद कामगिरी करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.
सात वर्षात पाच लाख श्वानांचे लसीकरण
मिशन रॅबिज प्रकल्पांतर्गत वर्ष 2015 पासून गोवा सरकारने राज्यात मोठय़ा प्रमाणात श्वानांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळे रॅबिजची लागण होण्याच्या प्रमाणात मोठी घट दिसून आली. या मोहिमेतून गत 7 वर्षात सुमारे पाच लाख श्वानांचे लसीकरण करण्यात आले.
मिशन रॅबिज अंतर्गत रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी), जागतिक आरोग्य संघटना आणि एडिनबर्ग विद्यापीठ यांचे तांत्रिक साहाय्य तर डॉग्ज ट्रस्ट चॅरिटी (युके) आणि एमएसडी ऍनिमल हॅल्थ यांचे आर्थिक साहाय्य प्राप्त झाल्यामुळेच राज्य सरकारला राज्यात रॅबिज नियंत्रणात आणण्यात यश प्राप्त झाले.
दरम्यान, अशाप्रकारे प्राप्त झालेले यश हे आनंदोत्सव साजरा करण्यायोग्य असून श्वानाबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी तसेच गोवा हे सुरक्षित राज्य असल्याचा संदेश देश-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत मिशन रॅबिजचे संचालक डॉ. मुरुगन अप्पुपिल्लई यांनी व्यक्त केले आहे.