यंदाच्या हंगामात उत्पादनात घट : येत्या आठवडय़ापासून सुपारी, मिरी खरेदी
प्रतिनिधी / फोंडा
राज्यातील काजू हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून बागायती मालाच्या खरेदी विक्री व्यावसायातील राज्यातील सर्वांत मोठी सहकारी संस्था असलेल्या गोवा बागायतदाने यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत साधारण 1700 टन म्हणजेच 1 लाख 70 हजार किलो काजू बियांची खरेदी केली आहे. देशव्यापी लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी काजूचे दर प्रतिकिलो रु. 136 होते. लॉकडाऊन काळात ते उतरले व रु. 105 वर आले. सद्या हा दर स्थीर आहे.
येत्या आठवडय़ापासून गोवा बागायतदारतर्फे सुपारी, मिरी व इतर हंगामी बागायती मालाची खरेदी सुरु होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काजू बियांची उत्पादन घटले आहे.
22 मार्चनंतर लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर बहुतेक व्यावहार बंद झाल्याने काजू व इतर बागायती मालाचा खरेदी विक्री व्यवहारही ठप्प झाला होता. लॉकडाऊन किंचित शिथील झाल्यानंतर सामाजिक अंतर राखून गोवा बागायतदारने 9 एप्रिलपासून काजू बिया खरेदीला सुरुवात केली. पहिल्या तीन दिवसांत 300 टन म्हणजे 30 हजार किलो काजू बिया खरेदी करण्यात आल्या.
काजू विक्रीसाठी राज्यातील बागायतदारांच्या सोयीसाठी गोवा बागायतदारच्या एकूण 12 मार्केट यार्डवर सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 वा. यावेळेत व्यवस्था करण्यात आली होती. सध्या राज्यातील काजूचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांची काजू विक्रीसाठी लगबग चालली आहे. बागायती मालाच्या खरेदी बरोबरच सध्या खत व शेती बागायतीसाठी लागणाऱया इतर साहित्याची विक्रीही सुरु असल्याचे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.