कृषीक्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्याचा संकल्प गोवा सरकारने केला आहे. राज्य खऱया अर्थाने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी गोवा कृषिप्रधान होणे अत्यावश्यक आहे व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक ठरतात.
कृषीक्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्याचा संकल्प गोवा सरकारने केला आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी गेल्या वर्षी गोवा क्रांतिदिनी सोहळय़ात हरितक्रांतीचा विचार मांडला होता. मात्र यात गोवा सरकार, कृषी संचालनालय तसेच समस्त गोमंतकीय जनता कितपत यशस्वी झाली, हा संशोधनाचा विषय ठरतो.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत झालेल्या एका बैठकीत कृषी अधिकाऱयांच्या कार्याचा अहवाल जाणून घेतला होता व त्यांना शेतात जाऊन शेतकरी तयार करण्याचा व कृषी उद्योग हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा सल्ला दिला होता. याला अनुसरून कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेने कोणती पावले उचलली व कृती योजना आखली याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परामर्ष घेणे अत्यावश्यक ठरते. गोवा राज्य कृषिसंपन्न बनविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा घेणे, काळाची गरज ठरते.
जगभरात कोरोनाच्या फैलावामुळे देशाबरोबरच गोमंतकीयांचेही जणू कंबरडेच मोडले आहे. अनेकांचे रोजगार गेलेत तसेच अनेकांच्या उद्योगांवर संक्रांत आलेली आहे. अशा परिस्थितीत पुढे काय करावे असा प्रश्न गोमंतकीयांसमोर उभा आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतीत उतरण्याचा निर्धारही काहींनी केला आहे. यासाठी काहींनी आपल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याचेही ठरविले आहे. गोवा राज्य खऱया अर्थाने स्वयंपूर्ण बनविण्यासाठी गोवा कृषिप्रधान होणे अत्यावश्यक आहे व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक ठरतात.
पूर्वीच्या काळात उच्च शेती, मध्यम उद्योग व कनिष्ठ नोकरी असे चित्र होते परंतु आता उच्च नोकरी, मध्यम उद्योग व कनिष्ठ शेती असे चित्र आहे. आता हलक्या, कष्टकरी कामाकडे गोमंतकीयांचा ओढा कमी होत आहे. गोमंतकीय आजकाल शेतीकडे पाठ फिरवत असून आजच्या युवकांचा कल पांढरपेशा सरकारी नोकरीकडे आहे. आज गोव्यात शेतजमिनीवर मोठमोठय़ा इमारती, राहण्यासाठी घरे बांधली जात असल्याने शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जास्तीत जास्त शेती कसली असावी यासाठी कृषी संचालनालयाने सध्या पावले उचलणे आवश्यक आहे.
गोव्यात शेतीविषयक जागृती करण्याच्यादृष्टीने संबंधितांकडून प्रयत्न होत आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कृषीविषयक ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने काही विद्यालयांनी शिक्षकांसह आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेत बांधावर कोरोना महामारीपूर्वी शाळा भरविल्या होत्या. शेत नांगरणी, पेरणी यांची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांकडून करवून घेतली होती. शेतीविषयी सध्याच्या पिढीमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी तसेच कृषी विषयक जागृती निर्माण करण्यासाठी अशाप्रकारचे उपक्रम राबविणे अत्यावश्यक ठरते.
पाण्याअभावी काहींनी शेतीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे पाण्याचे व्यवस्थापनही शेतीच्या प्रगतीच्यादृष्टीने केंद्रस्थानी असणारी बाब आहे, हे लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा शास्त्रीयदृष्टीने तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावा. यंदा पाऊसही समाधानकारक असून बळीराजा सुखावला आहे. गोमंतकीयांचा कल शेतीकडे झुकेल, असे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. शेतीत पाणी वापरताना आधुनिक दृष्टी ठेवणे व नव्या तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे. एकीकडे शेतीचा विचार चालू असतानाच शेती वाचविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन, जलसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्तरी तालुक्यातील केळावडे गावातील समविचारी नागरिकांनी एकसंध होऊन पाणी साठवण प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 51 लाख 50 हजार लीटर पाण्याचा साठा झाला आहे. अन्य तालुकावासियांनीही अशाप्रकारचे प्रयोग करणे काळाची गरज ठरते. सध्याच्या कोव्हिड-19च्या महामारीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. यामुळे सरकारने अनावश्यक प्रकल्पांवर विनाकारण खर्च न करता कृषिसंबंधित प्रकल्पांवर तसेच पाणी समस्या सोडविण्याच्यादृष्टीने आवश्यक ती आर्थिक उपाययोजना करणे सध्याच्या काळात अत्यावश्यक ठरते.
गोवा सरकारने यांत्रिकीकरणाला महत्त्व देत अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. गोव्यातील विविध मतदारसंघात बहुतांश मंत्री, आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी शेतकऱयांना प्रोत्साहन देण्याबाबत मोफत खत, बियाणे वाटपाचा उपक्रमही राबविला आहे. कोरोना काळात खऱया अर्थाने अशाप्रकारचे साहाय्य शेतकऱयांना उपयुक्त ठरले आहे. कृषी व्यवसायात चांगले भवितव्य आहे, अशी भावना ‘गोंयकारां’मध्ये निर्माण करणे तसेच शेतकऱयांनी आपल्या जमिनी राखून ठेवणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या तंत्ज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱयांनी हरितक्रांती घडवावी. गोमंतकीय युवकांनीही शेतीत काम करणे कमीपणाचे न मानता अभिमान बाळगून या व्यवसायात मजल मारून जास्तीत जास्त पिके घ्यावीत. शेती व्यवसायामध्ये गोवा राज्य आदर्श बनविण्यासाठी व गोवा कृषीप्रधान करण्यासाठी सर्वांनी कंबर कसणे काळाची गरज आहे.
आज गोवा राज्याची मदार केवळ पर्यटनावरच अवलंबून असून पर्यटनासंबंधित व्यवसायही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डबघाईस आलेले आहेत. त्यामुळे युवकांनी आज कृषी क्षेत्राशी निगडित पशुपालन, दूध उत्पादनात रस घेऊन स्वतःबरोबरच समाजाचा विकास घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. राज्यातील शेतकरी काही व्यावहारिक झालेले आहेत. कमी खर्चात कमाल लाभ मिळावा व आपली आर्थिक स्थिती सुधारावी यासाठीही प्रयत्नात आहेत. बाजारात चांगली मागणी असलेल्या किमती पिकाच्या लागवडीवर काही शेतकऱयांनी भर दिला आहे. हळद उत्पादनाकडेही काही शेतकरी वळलेले आहेत. हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात शेतकरी बनविण्याचे उद्दिष्ट तसेच गोवा राज्य कृषिसंपन्न बनविण्याचे स्वप्न सरकारी यंत्रणेकडून पूर्ण होईल काय, असा सवाल साहजिकच उपस्थित होत आहे.
राजेश परब