मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
सत्य, अहिंसा आणि सर्वधर्म समभावतेच्या सातत्याचे प्रतीक म्हणजे महात्मा गांधी. जे विचार महात्मा गांधी यांनी दिले होते ते विचार सरकार गोमंतकीयांमध्ये नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कार्य करत आहेत. जगात सत्य अहिंसाचे विचार देण्यासाठी मोदी कार्य करत आहेत. गांधीजींच्यानुसार देश हा ग्रामीण भागात वसतो. त्यामुळे ग्रामीण भाग जर स्वयंपूर्ण झाला तर देश स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर होऊ शकतो. यासाठी याची सुरुवात आपल्यापासून करावी, असे त्यांनी सातत्याने सांगितले होते आणि आचरणात आणावे असे सांगितले होते. गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले पाहिजे. स्वच्छ भारत मिशन ग्रामपंचायत स्तरावर सुरू केले आहेत. त्याला सहकार्य करून गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमो द सावंत यांनी केले.
सरकारतर्फे ओल्ड गोवा येथे आयोजित केलेल्या महात्मा गांधी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार पांडुरंग मडकईकर, सरपंच जनीता मडकईकर, जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, पंचसदस्य, अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते ओल्ड गोवा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला पुष्पांजली वाहण्यात आली.
ग्रामीण भाग हा स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. मोदींनी सुरू केलेली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या आधारावर स्वयंपूर्ण गोवा सुरू केली आहे. स्वयंपूर्ण गोवा मोठी उभारी मिळत आहे. 191 स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायतीत उत्तमरित्या कार्य करत आहेत. प्रत्येक गावात अंत्योदय तत्त्वावर कार्य करून शेवटच्या घटकांपर्यंत पोहचले पाहिजे. आज स्वयंपूर्ण गोवा या मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत आहे. गोवा स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.