लहानपणी नेमकं केव्हा हे गाणं ऐकलं… आठवत नाही. ते आपल्या जगण्यातल्या एका दिवसाचा भाग बनलं आहे. बाकीची गाणी त्याची जागा घेऊ शकणार नाहीत. प्रत्येक गाण्याची एक सामाजिक जागा असते. पसायदान ऐकले की सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात, ‘ए मेरे वतन के लोगो’ ऐकले की राष्ट्रीय कार्यक्रम आणि ‘गणराज रंगी नाचतो’ ऐकले की गणेश चतुर्थीची पूजा.. मनःचक्षूसमोर उभे राहतात.
गेली दोन वर्षे दही हंडीचा कार्यक्रम झाला नाही. बाहेर कोरोना पसरला होता. कोरोना असताना दही हंडीचे कार्यक्रम आणि गर्दी केली असती तर साक्षात कन्हैयानेदेखील आपल्याला वाचवलं नसतं. चूक करणाऱयाला तो क्षमा करीत नाही. त्याने स्वतःच्या मामाला, मामाच्या सासऱयालादेखील शिक्षा करताना दयामाया दाखवली नाही. शिशुपालाने गाढवपणा केला तेव्हा त्याचा शिरच्छेद करायला मागेपुढे पाहिले नाही. त्या श्रीकृष्णाने आपल्याला तोच न्याय लावला असता. आपण निर्बंध तोडून रस्त्यावर गर्दी केली असती तर कोरोनाने आपल्याला नक्की गाठले असते. केव्हातरी तो जाईल. त्यावेळी दही हंडीच काय इतर उत्सवदेखील साजरे करूच. पण यंदा दही हंडी झाली नाही तरी आम्ही आंतरजालावर ‘गोविंदा आला रे’ ऐकलं आणि मनातल्या मनात दही हंडीचा आनंद घेतला. काही गमतीदार उपमा देखील मनात येऊन गेल्या. लोकशाहीत आदर्श सरकार पाच वर्षे टिकते. ती पाच वर्षे म्हणजे पाच थर. सध्या सरकारचे दोन थर यशस्वीरित्या लावून झालेत. दही हंडीत गोविंदा थर लावतात तेव्हा शेजारच्या घरातून लोक त्यांच्या अंगावर पाणी टाकतात. पण गोविंदा त्याला दाद देत नाहीत. सरकारवर विरोधी पक्ष हल्ले करत आहेत. सरकार त्याला दाद देत नाही! दुसरी एक उपमा मनात आली… विज्ञानावर प्रेम असलेल्या डोळस कार्यकर्त्यांनी पहिला थर लावलाय. हे कार्यकर्ते लोकांना मास्क लावण्याचे, गर्दी टाळण्याचे आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावतात. दुसऱया थरावर आरोग्य विभागातले कर्मचारी आहेत, तिसऱया थरावर कोरोना योद्धे आहेत, चौथ्या थरावर लशीचा शोध लावू बघणारे शास्त्रज्ञ आहेत. पाचव्या थरावर आपली सबंध तरुण पिढी आहे. दही हंडीतले उत्तम आरोग्याचे दही सर्वप्रथम तिला मिळणार आहे!
सरकारांना स्थैर्याची, देशाला कोरोनामुक्तीची आणि तुम्हा-आम्हाला भाववाढ मुक्तीची दहीहंडी लाभो ही शुभेच्छा!
निरोप घेतो आपला, धन्यवाद!!