रवी नाईक यांचे उद्गार
वार्ताहर /माशेल
प्रियोळ मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले मंत्री गोविंद गावडे यांनी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला. मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात वीज, पाणी, रस्ते व इतर मूलभूत गरजा गेल्या साडेचार वर्षात त्यांनी पोचविल्या. एकेकाळी प्रियोळ मतदारसंघ हा अत्यंत ग्रामीण व मागासलेला असे चित्र होते. 2017 मध्ये जेव्हा गोविंद गावडे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा या मतदारसंघाचे भाग्य उजळले असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी केले. ‘हर बोले’ प्रियोळ प्रगतीपथावर या पुस्तकाचे प्रकाशन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
माशेल येथे झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री गोविंद गावडे, बेतकी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच दिलीप नाईक, सत्यवान शिलकर, अनिशा गावडे, डॉ. शेखर शिरवईकर, अनुसूचित जमात महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, प्रगती मंचचे अध्यक्ष सर्वेद्र फडते, सुनील भोमकर हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले, प्रियोळ मतदारसंघातील जनतेने गेल्या साडेचार वर्षाच्या काळात आपल्याला भरभरून प्रेम दिले. प्रियोळात आज जो विकास झाला तो मतदारांच्या सहकार्यामुळे. कोरोना काळात हाती घेतलेली विकासकामे काही काळ बंद ठेवावी लागली. परंतु कोरोनाची लाट ओसरताच झपाटय़ाने कामाला सुरुवात झाली. निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात दिलेल्या बहुतेक आश्वासनांची पूर्तात केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते रवी नाईक यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रोहित खांडेकर यांनी केले. त्यानंतर प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला श्रोते व गोविंद गावडे यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.