आजही 18 जूनसारखी क्रांती करावी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : आझाद मैदानावर क्रांती दिन साधेपणाने साजरा
प्रतिनिधी / पणजी
आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी भार उचलण्याची गरज असून युवकांनी त्याकरीता पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी क्रांती दिन कार्यक्रमात केले. शिक्षण, कृषी, आयटी अशा विविध क्षेत्रात युवकांनी अग्रेसर व्हावे. सर्वांच्या सहकार्याने यापुर्वी 18 जून रोजी जशी गोवा राज्यासाठी क्रांती झाली तशी क्रांती यापुढेही झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करून गोव्याला पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा 18 जून क्रांती दिन पणजीतील आझाद मैदानावर साधेपणाने साजरा करण्यात आला. राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहून गोवा मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. पणजीचे महापौर उदय मडकईकर, मुख्य सचिव परिमल राय तसेच सरकारी पोलीस अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती. जोरदार पावसातच हा कार्यक्रम करून तो आटोपता घ्यावा लागला.
जनतेच्या सहभागामुळे राज्य प्रगतीपथावर
जनतेच्या सहभागामुळेच गोवा राज्य प्रगतीपथावर गेले आहे. तोच सहभाग सर्वांनी आताही पुढे कायम ठेवावा. विविध क्षेत्रात युवकांनी पुढे यावे. त्यांना सरकार सर्व ते सहकार्य देण्यास, मदत करण्यास तयार आहे असेही डॉ. सावंत म्हणाले.
आझाद मैदानावर साधेपणाने सोहळा
यंदाच्या क्रांतीदिनास स्वातंत्र्यसैनिकांना बोलावण्यात आले नाही तसेच भरपूर पावसामुळे लोकही फारसे नव्हते. तेथे गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आणि ती टाळण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक तसेच जनतेकरीता हा क्रांती दिन खुला ठेवण्यात आला नाही. सरकारी तसेच पोलीस अधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सुरक्षेसाठी असलेले पोलीस यांच्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहीला. डॉ. सावंत यांनी थोडक्यात भाषण केले तर राज्यपालांचे भाषण झाले नाही.
विद्यालयांना पुन्हा शिकवणी घ्यावी लागेल
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की शाळा कॉलेज कधी सुरू करायची याबाबत काहीच ठरलेले नाही. ऑनलाईन शिक्षण हे सक्तीचे नाही. त्यात अनेक अडचणी, गैरसोयी आहेत. तरीही विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी काळजी करू नये. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम चुकतोय याची खंत आहे तथापि तो शाळांनी नंतर घ्यावा आणि विद्यार्थ्यांना शिकवावे तसे बंधन शाळांवर घालण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज सुरू झाली की अभ्यासक्रमाबाबत निर्णय घेण्यात येईल. अनेक शाळांनी ऑनलाईन शिकवणी चालू केली आहे. अनेकांना ती चुकते म्हणून चुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवणी करावी, अशा सूचना शाळांना देण्यात येतील असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ला लोकच जबाबदार : मुख्यमंत्री
इंटरनेटची जोडणी (कनेक्टिव्हिटी) मिळत नाही त्याला लोकच जबाबदारी असल्याची टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मोबाईल टॉवर्सला लोक विरोध करतात. त्यामुळे अनेक गावात इंटरनेटची जोडणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेशी साधनसुविधा गोव्यात नाही हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. त्यालाही लोकच जबाबदार ठरतात. ज्या वेळी टॉवर्स उभारण्यासाठी प्रयत्न होतात तेव्हा लोक अडवतात, मग इंटरनेट कसे मिळणार? असा सवाल त्यांनी करून विकासासाठी जनतेचा सहभागही महत्त्वाचा असतो, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.