नोकऱयांच्या विक्रीवरून अमित पालेकर यांचा इशारा : दाबोळीत आपच्या ’महासभेला’ नागरिकांची अलोट गर्दी
प्रतिनिधी /पणजी
सरकारी नोकऱयांची संपूर्ण व्यवस्था पारदर्शक केली जाईल. केवळ पात्र लोकांनाच सरकारी नोकऱया मिळतील. तसेच आमदार किंवा प्रभावशाली राजकारण्यांच्या मर्जीने सरकारात नोकरभरती करण्याची सध्याची प्रथा रद्द केली जाईल, असे ठाम प्रतिपादन आप नेते ऍड. अमित पालेकर यांनी केले.
आम आदमी पार्टीच्या दाबोळीत झालेल्या महासभेत ते बोलत होते. आपचे उपाध्यक्ष बाबू नानोस्कर यांच्या उपस्थिती आयोजित या महासभेला सुमारे 5000 लोक उपस्थित होते.
या सभेत सरकारी भरतीत होणाऱया लाचखोरीची तक्रार करण्यासाठी आप ने हॉटलाईन नंबर जारी केला. नुकतेच आरोग्य आणि साबांखातील भाजपचा सर्वात मोठा नोकरभरती घोटाळा ऍड. पालेकर यांनी उघड केला होता. या भरतीदरम्यान कोणतीही प्रक्रिया पाळली गेली नाही आणि पत्रे पाठवण्यापूर्वी लोकांची नियुक्ती केली गेली. 95 टक्के नोकऱया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या वाळपई मतदारसंघातील लोकांना गेल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
आप सत्तेवर आल्यास या चोरांना इतकी कठोर शिक्षा होईल की भविष्यात लोकांकडून पैसे उकळण्याची हिंमत कोणी करणार नाही आणि आमचे सरकार त्यांच्याकडून तुमचे पैसे परत मिळवून देईल. गोव्यात आता टॅलेंट आणि मार्क्स महत्त्वाचे राहिलेले नाहीत, हे या घोटाळय़ावरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व गोमंतकीयांनी एकत्र येऊन आप सारख्या प्रामाणिक पक्षाला मतदान केल्यास परिस्थिती बदलेल, असा विश्वास पालेकर यांनी व्यक्त केला.
दाबोळी हे गोव्यातील बेरोजगारीच्या बाबतीत सर्वात जास्त प्रभावित ठिकाणांपैकी एक आहे. लॉकडाऊन दरम्यान तेथील तरुणांनी नोकऱया गमावल्या. लॉकडाऊनमुळे दाबोळी मधील टॅक्सी चालकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले. तरीही सरकारने त्यांना पाठिंबा देण्यासाठी काहीच केले नाही असा आरोप उपाध्यक्ष बाबू नानोस्कर यांनी केला. सध्या, आप ने राज्यात घरोघरी प्रचार आणि परिवर्तन यात्रांना गती दिली आहे. त्याचाच भाग म्हणून दाबोळीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तिला अलोट गर्दी उसळून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.