ओनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेने देशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका लढविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत तयारीला लागले आहेत. शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा येथे निवडणूक लढविणार आहे. गोव्यात शिवसेना राष्ट्रवादी बरोबर युती करणार आहे. त्यामुळे गोव्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत धक्का द्यायचा असा शिवसेनेनं ठरवलं आहे. आता तर शिवसेनेने भाजपवर जहरी टीका केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी संवाद साधत शिवसेनची भूमिका स्पष्ट केली. “गोव्यातील सामान्य लोकाना प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेलं आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रं आहेत आणि ते गोव्याचं भविष्य ठरवतात. हे जर मोडायचं असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकाना निवडणुकीत मतदान करावं आणि निवडून आणावं. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी, उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केलं. गोव्यात हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
तसेच, “राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र नाही होऊ शकलं. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही.” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.