चेकनाक्यांवर आता पैसे, प्रमाणपत्राची गरज नाही : कोरोना चाचणी सक्तीची नाही : सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरळीत : राज्यातील बार-रेस्टॉरंटही खुले : शाळा, महाविद्यालयांबाबत निर्णय नाही : सामाजिक अंतर, मास्क वापर सक्तीचेच : पोलीस कारवाई सुरुच राहणार
प्रतिनिधी / पणजी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आज मंगळवार 1 सप्टेंबरपासून गोवा राज्याच्या सर्व सीमा सर्वांसाठी खुल्या करण्यात येणार असून कोणत्याही निर्बंधाशिवाय गोव्यात प्रवेश करायला मिळणार आहे. रेस्टॉरंट, बार देखील आजपासून चालू होणार असून सीमेवर कोणालाही कोरोनाची चाचणी सक्तीची केली जाणार नाही. राज्यातील शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. अनलॉक 4.0 च्या मार्गदर्शक तत्वांची गोव्यात कार्यवाही होणरा असल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, सीमा खुल्या करण्यात आल्या तरी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापर हे निर्बंध कायम आहेत. त्यात कोणताही बदल नाही. त्यांचे पालन प्रत्येकाने करणे बंधनकारक असून त्या विरोधात पोलीस कारवाई चालूच राहणार आहे. गोव्याच्या सीमेवरून गोव्यात प्रवेश करणाऱयांना आता कोरोना चाचणीचे बंधन नाही. केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाने (एमएचए) नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्याचे तंतोतंत पालन गोव्यात होणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोना रुग्णांवर चांगले उपचार
गोव्यात सापडणाऱया कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होत असून कोविड 19 चे व्यवस्थापन योग्यरितीने चालल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. सर्व संबंधितांची बैठक घेऊन कोरोनाचे व्यवस्थापन उपचार सोयी सुविधा यांचा आढावा घेतल्याचे त्यांनी नमूद केले. गोमेकॉ, ईसआय हॉस्पिटल, आरोग्य खाते यांच्या सर्व प्रमुखांची बैठक डॉ. सावंत यांनी बोलावली होती. गोमेकॉतील 146, 147 हे वॉर्ड अनुक्रमे आयसीयू व आयटीयूसाठी राखीव असून ते पूर्ण भरले आहेत. 132 हा वॉर्ड कोरोना रुग्णांसाठी सर्जिकल म्हणून राखून ठेवण्यात आला आहे. तेथे कोरोना रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. 122 हा वॉर्ड आयसोलेशनसाठी ठेवण्यात आला असून मडगावाचे 210 खाटांचे कोविड ईएसआय हॉस्पिटल फूल्ल झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे काहीजणांचे बळी गेले असले तरी त्यातील अनेकजण लवकर उपचारासाठी आले असते तर वाचले असते, असा दावा डॉ. सावंत यांनी केला.
लोकांमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी काही नवी उपकरणे तसेच अतिरिक्त नर्स देण्याची गरज त्यांनी वर्तविली. गणेशचतुर्थीत लोकांनी गर्दी केली. सामाजिक अंतर पाळले नाही. मास्क वापरले नाहीत. त्याचे परिणाम म्हणून आता कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
सीमांवर आता पैसे, प्रमाणपत्राची गरज नाही
गोव्याच्या सीमेवर यापुढे कोरोना चाचणीसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. तसेच कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्रांची मागणी केली जाणार नाही. कोणालाही अडवण्यात येणार नसल्याचे डॉ. सावंत म्हणाले. त्यामुळे आता शेजारील राज्यातील वाहने मुक्तपणे गोव्यात ये जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुखर्जींच्या निधनामुळे राज्यात सात दिवसीय दुखवटा
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे डॉ. सावंत यांनी दुःख प्रकट केले आणि त्यांना गोवा राज्याच्यावतीने श्रद्धांजली वाहिली. त्यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून ते कधीही विसरता येण्यासारखे नाही, असे त्यांनी नमूद केले. मुखर्जींच्या निधनामुळे राज्यात सात दिवसीय शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.