गोव्यासारख्या साक्षरतेचे लक्षणीय प्रमाण असलेल्या राज्यात चार वाघांच्या मृत्युचे उघडकीस आलेले प्रकरण हे इथल्या जंगल क्षेत्राच्या आणि वन्य जीवांच्या गैरव्यवस्थापनावर प्रकाशझोत टाकणारे होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या म्हादई अभयारण्यातील गोळावलीत चार वाघांची निर्घृणरित्या करण्यात आलेली हत्या ही खेदजनक दुर्घटना होती. सदर चार वाघांचा मृत्यू विषप्रयोगाद्वारे झालेला असलातरी त्यांचे मृतदेह तीन-चार दिवसानंतर सापडल्याने त्या संदर्भात ठोस सांगण्यासाठी वन अधिकाऱयांजवळ त्यावेळी अधिकृत पुराव्यांचा अभाव होता. गोळावली येथील जंगल क्षेत्रात आपल्या दोन बछडय़ांसह दुसऱया युवा वाघासाठी जेव्हा वाघिणीने म्हशीची हत्या केली होती, तेव्हा वन खात्याच्या कर्मचाऱयांनी संबंधित धनगर कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते परंतु या वाघांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार केलेल्याने नियोजनबद्धरित्या मेलेल्या म्हशीवरती जहाल विष शिंपडल्याने ते मांस भक्षण करून चार वाघांचा करुण मृत्यू उद्भवला परंतु त्यांचे मृतदेह 78 तासानंतर कुजलेल्या स्थितीत आढळल्याने, त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला, हे स्पष्ट करणे दुरापास्त होते.
विषप्रयोगाद्वारे वाघांचा झालेला मृत्यू तीन-चार दिवसांनी उघडकीस आल्याकारणाने, त्यांच्यावरच्या विषप्रयोगाचे ठोस पुरावे सापडणार नाही, असे वाटत होते परंतु गोळावली येथील वाघ हत्येसंबंधी सत्य शोधण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले चौकशी अधिकारी आणि साहाय्यक वनपाल नंदकुमार परब यांनी, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे या चारही मृत वाघांचे जे अवशेष आढळले, त्यांची चिकित्सा व्हावी, यासाठी जे नियोजनबद्ध प्रयत्न केले म्हणूनच त्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचे सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरले. भारत देशात विषप्रयोगाद्वारे एकाच प्रकरणातून चार वाघांची हत्या करण्याचा प्रकार हा हादरवून टाकणारा असाच होता. या वाघांचे मृतदेह अत्यंत विकल स्थितीत आढळल्याने त्यांची हत्या विषप्रयोगाद्वारे झाली, असे वन खात्यातर्फे सांगण्यात आलेले असले तरी न्यायालयात संशयितांविरुद्ध खटला उभा करण्यासाठी अधिकृत पुराव्यांची गरज होती. त्यासाठी साहाय्यक वनपाल नंदकुमार परब यांनी म्हादई अभयारण्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक संतोषकुमार आणि उपवनपाल विकास देसाई यांना विश्वासात घेऊन अमेरिकेहून एलिसा चिकित्सा उपकरणांचा, विषप्रयोगाद्वारे वाघाची हत्या झाली, हे सिद्ध करण्यासाठी गरज असल्याचे पटवून दिले. त्यामुळे संपूर्ण देशभरात आजतागायत कधीच उपयोगात न आणलेल्या एलिसा चिकित्सा उपकरणांचा उपयोग करून व्याघ्र हत्येमागची गुंतागुंत अधिकृतरित्या सोडविण्यात यश लाभलेले आहे. गोवा मुक्तीनंतर इथल्या पश्चिम घाटातल्या जंगलात पट्टेरी वाघांच्या हत्या मोठय़ा प्रमाणात केल्या जात होत्या. गोव्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 लागू करण्यात आला तरी वाघ हत्या करण्यात येत होत्या. 2009 साली केरी सत्तरीत उद्भवलेली वाघाची हत्या प्रकाशात आली आणि त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये चार वाघांच्या हत्येची दुर्घटना गोळावलीत उघडकीस आली.
सत्तरीतल्या सहय़ाद्रीच्या जंगल क्षेत्रात केवळ दहा वर्षांच्या कालखंडात पाच वाघांची निर्घृणरित्या करण्यात आलेली हत्या ही एका साक्षर आणि सुशिक्षित गणल्या जाणाऱया राज्याच्या वनक्षेत्र आणि वन्यजीवासंदर्भातल्या गैर व्यवस्थापनावर प्रकाशझोत टाकणारी होती. त्यामुळे गोळावलीतल्या पट्टेरी वाघांचा मृत्यू खरोखरच नियोजनबद्ध विषप्रयोगाद्वारे केली, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालेले असले तरी न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी अधिकृत पुरावे मिळविणे हे एक मोठे आव्हान गोव्यातल्या वन खात्यासमोर होते. गोव्याच्या वन खात्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या बेंगलोर येथील प्रादेशिक कार्यालयाची मदत घेतली. वाघांच्या मृतदेहाचे गोळा केलेले नमुने पशुवैद्यकीय संशोधन संस्था आणि या क्षेत्रातील निष्णात तज्ञ डॉ. प्रयाग यांच्याकडे चिकित्सेसाठी पाठविण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने त्यांनी जेव्हा या नमुन्यांची सखोल चिकित्सा केली, तेव्हा विषप्रयोगासंदर्भातले वाघांच्या मृत्युचे कारणमीमांसा करणारे अहवाल नकारार्थी आले होते आणि त्यामुळे डॉ. प्रयाग चिंतीत होते. वन्यजीवांच्या आकस्मिक मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी अमेरिकेत एलिसा चाचणी उपकरणांचा वापर यशस्वी ठरल्याची माहिती डॉ. प्रयाग यांना असल्याने त्यांनी तिचा उपयोग करण्याची शिफारस गोव्याच्या वन खात्याला केली आणि त्यानुसार लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी दोन लाख रुपये खर्चून एलिसा चाचणी उपकरणे आणली. भारतीय वन्यजीवांच्या मृत्यू प्रकरणामागचे सत्य शोधण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच या उपकरणांचा उपयोग करण्यात आला. मृत झालेल्या प्रत्येक वाघाचे जे नमुने गोवा वन खात्याने जतन करून ठेवले होते, त्यांच्यावरती एलिसा चाचणी उपकरणांचा उपयोग स्वतंत्र्यरित्या करण्यात आला आणि संशोधनाअंति गोळावली येथे हत्या करण्यात आलेले वाघ विषप्रयोगाद्वारे मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झालेले आहे.
आपल्या गुरा-ढोरांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या वाघांची विषप्रयोगाद्वारे एका झटक्यात हत्या करण्याची ही घटना वन्यजीव संरक्षण क्षेत्रात वावरणाऱया व्यक्ती आणि संस्थांसाठी जशी दर्दभरी ठरली तशीच सर्वसामान्यांनासुद्धा या घटनेने हादरून सोडले होते. गोव्यात लोह, मँगनीज, बाक्साईटसारख्या खनिजांबरोबर रेती, खडी, चिरे यांचे उत्खनन चालू ठेवण्यात इथल्या सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत असल्याने, त्यांच्यासाठी चार पट्टेरी वाघांची विषप्रयोगाने केलेली हत्या, चिंतेचा विषय ठरत नाही. गेल्या दीड दशकापासून गोवा सरकार असो अथवा वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी इथे पट्टेरी वाघ नसल्याचा कंठशोष करीत आहे. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवरती गोळावली जंगलात चार वाघांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला, हे आधुनिक वैज्ञानिक तंत्राद्वारे सिद्ध करण्यात गोवा वन खात्याला यश लाभले, ही निश्चितच स्पृहणीय बाब आहे. विषप्रयोगाद्वारे चार वाघांची हत्या करण्यात गुंतलेल्या पाच संशयितांना वन खात्याने चौकशीसाठी ताब्यात घेऊन, या प्रकरणाच्या मुळाकडे जाण्याचा जो प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांना बळकटी देण्याच्या दृष्टीने एलिसा चाचणी उपकरणांद्वारे जे अहवाल प्राप्त केलेले आहेत, ते उपयुक्त ठरणार आहे, ही समाधानकारक बाब आहे.