आमदार चर्चिल आलेमाव यांची मागणी
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात ड्रग्स व्यवसाय प्रचंड प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे गोव्यातील युवा पिढी बरबाद होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित गोव्यातील ड्रग्स व्यवसाय बंद करावा अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली आहे. जर ड्रग्स व्यवसाय कायम स्वरूपी बंद व्हायचा असेल तर काही सरकारी अधिकारी व पोलीस अधिकाऱयांचे वेतन रोखले पाहिजे असे चर्चिल आलेमाव पत्रकार परिषदेत म्हणाले.
गोव्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे, अशावेळी सरकारने राज्याच्या सीमा पुन्हा एकदा बंद कराव्यात. आज देशी-विदेशी पर्यटक गोव्यात येतात, अशा पर्यटकांनी स्वताची तब्येत ठिकठाक असेल तरच गोव्यात यावे, जर आजाराची लक्षणे असेल तर त्यांनी येऊ नये. जेणे करून गोव्याची परिस्थिती वाईट होईल, गोव्यात समस्या निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी ‘सनबर्न’ कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारातील मंत्र्यांना सनबर्न का हवा या प्रश्नाचे उत्तर केवळ देवच देऊ शकेल असेही ते म्हणाले.
मोदी व शहा यांना काँग्रेस पक्ष घाबरतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घाबरतोय. हे दोन्ही राजकीय पक्ष भाजपला टक्कर देऊ शकत नाही. केवळ तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतात, त्यामुळे आपण तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती चर्चिल आलेमाव यांनी दिली.
गोव्यात पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी जनतेसाठी चांगले कार्य केले होते. त्यांनी केवळ एकच चुक केली ती म्हणजे गोवा महाराष्ट्रात विलीनीकरणाचा निर्णय घेतला तो. त्यावेळी विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांनी विरोध करून गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यापासून बचाव केला. बांदोडकर व सिक्वेरा हे दोन्ही नेत्यांनी गोव्यासाठी आपआपल्या परिने योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे पाच आमदार होते
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यावर आपण काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आपल्याजवळ पाच आमदार होते असा दावा चर्चिल आलेमाव यांनी केला. मात्र, त्यांना वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदिल दिला नाही. आपण 15 दिवस वाट पाहिली अशी माहिती चर्चिल आलेमाव यांनी दिली. त्यानंतर डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले व आपण त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे आपल्या बाणावली मतदारसंघात विकासकामे राबविणे शक्य झाल्याचा दावा केला. बजरंग दल व राष्ट्रीय स्वयं सेवक संघ यांच्यामुळे आपण भाजपच्या विरोधात आहे व गोव्यात आगामी सरकार हे तृणमूल काँग्रेसचेच असेल अशी माहिती यावेळी दिली.