प्रतिनिधी / मडगाव :
गोव्यातील प्रत्येक घराला मार्च 31 पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मडगावात ‘सरस’ खरेदी-विक्री प्रदर्शनाच्या उघाटन सोहळय़ात बोलताना दिली. पणजीत लोकोत्सव होत असतो. तर मडगावात दर वर्षी ‘सरस’चे आयोजन केले जाते. या दोन्ही कार्यक्रमाची स्थानिक तसेच गोव्याबाहेरील लोक वाट पहात असतात. यंदा म्हापसा येथे ही ‘सरस’ प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सरसच्या उद्घाटन सोहळय़ाला उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, ग्रामिण विकासमंत्री मायकल लोबो, प्रकल्प संचालिक मीना गोलतेकर, शंकर गांवकर, उल्हास कदम, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष नवनाथ नाईक, मिसिज ग्लोबाल इंडियाच्या विजेत्या गायत्री पार्सेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी कार्यरत असते. कमी मनुष्यबळ घेऊन ही यंत्रणा चांगले कार्य करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आत्ता या खात्याला आवश्यक मनुष्यबळ देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आत्ता पर्यंत शहरातील विकास सर्वांनी बघितला आहे. आत्ता ग्रामीण भागाच्या विकासावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडे कित्येक वर्षे दुर्लक्ष झाले होते. मात्र, मायकल लोबो यांनी या खात्याचा ताबा घेतल्यापासून अनेक गोष्टी सूव्यवस्थित करण्यावर भर दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यातील काही भागात अद्याप शौचालये उपलब्ध झालेली नाही. मात्र, 31 मार्च पर्यंत शंभर टक्के लोकांना शौचालये उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. गोव्यात 87 टक्के लोकांना नळाचे कनेक्शन दिलेले आहे. ते 31 मार्च पर्यंत शंभर टक्क्यावर नेण्यात येईल. जिथे जलवाहिनी जाऊ शकत नाही, त्याठिकाणी पाणी उलपब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल. गोव्यातील 97 टक्के लोकांना वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. अद्यापही तीन ते चार टक्के लोकांना वीज मिळू शकलेली नाही. त्याची चिंता आपल्याला आहे व 31 मार्च पर्यंत त्यांनाही वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात एलपीजी गॅस वितरण शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याचे प्रकार देखील बंद झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. आगामी अर्थ संकल्पात सुद्धा ग्रामीण विकासासाठी खास तरतूद केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सरकार कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करणार नसल्याची माहिती देताना, नवीन योजना घेऊन सरकार पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकत्व विधेयकावर चर्चेसाठी तयार
सद्या नागरिकत्व विधेयकाचा मुद्या घेऊन विरोधक जाती-धर्मावरून फुट घालू पहात आहे. पण, हा प्रकार सरकार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने, विरोधक नागरिकत्व विधेयकाचा मुद्दा घेऊन लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकत्व विधेयकाचे समर्थन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, या विषयावर आपण कुठेही व कुणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहे व विरोधकांनी आपले हे आव्हान स्वीकारावे. नागरिकत्व विधेयकालामुळे गोव्यातील एकाही व्यक्तीवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘सरस’द्वारे ग्रामीण भागातील महिला मार्केटची संधी
सरस प्रदर्शनाच्या आयोजनाने गोव्यातील भागातील महिला मार्केटची सोय उपलब्ध होत असते. ग्रामीण भागात अनेक स्वयं सहाय्यक गट खाद्य पदार्थ तयार करतात त्याच बरोबर इतर वस्तु तयार करतात, त्यांना अशा प्रदर्शनातून व्यासपीठ मिळत असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर म्हणाले. प्रत्येकाने स्वताच्या पायावर उभे रहावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून सरकार प्रोत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.
मेरशी येथे महिलासाठी मार्केट उभारण्याची तयारी
सरकारने महिलांना मार्केट उलपब्ध करून देण्यासाठी मेरशी येथे जागा संपादन केली आहे. पण, तांत्रिक मुद्यामुळे अद्याप या मार्केटला मान्यता मिळालेली नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी जर ही फाईल लवकर हातावेगळी केली तर वर्षभरात आपण महिलांसाठी मार्केट प्रकल्प उभारू शकतो असे मंत्री मायकल लोबो म्हणाले. केंद्र सरकारकडून आरडीएसाठी 12 कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून हा प्रकल्प साकारला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरस प्रदर्शनात यंदा 13 राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. याठिकाणी थेट ग्राहकाशी संपर्क साधण्याची संधी त्यांना मिळत आहे. या ठिकाणी मध्यस्त कुणीच नाही. त्यामुळे विविध वस्तु तयार करणाऱयावर अन्याय होण्याचा प्रश्न उदभवत नाही.