प्रतिनिधी / वास्को
अखिल गोवा बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी दाबोळीत वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांची भेट घेऊन बस प्रवासी वाहतुकीविषयी अडचणी मांडल्या व या व्यवसायाला दिलासा देण्याची मागणी केली. मंत्र्यांनीही त्यांच्या अडचणी ऐकून पुन्हा एकदा हा विषय मुख्यमंत्र्यासमोर मांडून दिलासादायक तोडगा काढण्याचे आश्वासन या संघटनेच्या पदाधिकाऱयांना दिले. यावेळी वाहतुक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर व सहाय्यक संचालक राजेश नाईक उपस्थित होते.
मंगळवारी दाबोळीतील मंत्री माविन गुदिन्हो यांच्या कार्यालयात अखिल गोवा बस मालक संघटनेचे पदाधिकारी व संघटनेचे काही सदस्य आपल्या अडचणी, मागण्या आणि बस प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दाखल झाले होते. मंत्री गुदिन्हो यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संघटनेच्या पदाधिकाऱयांन दिलेल्या माहितीनुसार दीड महिन्यांनंतर त्यांनी आपल्या बसगाडय़ा रस्त्यावर आणल्या. काही दिवस व्यवसाय करून पाहिला. मात्र, सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करून हा व्यवसाय चालवणे शक्य नसल्याचे त्या दरम्यान स्पष्ट झाले. वस्तुस्थितीचा अहवाल आम्ही सरकारलाही दिलेला आहे. प्रवाशांअभावी व्यवसाय चालवणे कठीण ठरल्याने बसगाडय़ा बंद पडलेल्या आहेत. शिवाय बऱयाच बस मालकांना सबसीडी मिळालेली नाही. सध्या निर्माण झालेल्या व्यवसायाच्या स्थितीवर तोडगा काढण्यात यावा तसेच सबसीडी, विमा व इतर समस्यां सोडवण्याच्या मागणीसाठी वाहतुकमंत्र्यांची भेट घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. वाहतुकमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही आजपासून पुन्हा जनतेची गैरसोय टाळण्यासाठी बस प्रवासी वाहतुक व्यवसाय सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी गोव्यातील बसमालकांसमोर सरकारने प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांना तो प्रस्ताव मान्य झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वताहून बस प्रवासी वाहतुक व्यवसाय केला. मात्र, त्यानाही आता आर्थिकदृष्टय़ा व्यवसाय करणे कठीण असल्याचे दिसून आल्याने पुन्हा एखादा दिलासादायक तोडगा काढता येणे शक्य आहे काय अशा चर्चेसाठी व त्यांच्या अन्य समास्यांसंबंधी बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी भेट घेतली. त्यांच्या अडलेल्या सबसीडी वितरीत करण्याची सुचना आपण वाहतुक संचालकांना केलेली आहे. तसेच त्यांना विमाही जुलैपर्यंत भरावा लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, प्रवासी बस वाहतुकीसाठी दिर्घकाळाची योजना तयार करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सखोल विचार व चर्चा करावी लागणार आहे. बस मालक संघटनेकडूनही पुन्हा प्रस्ताव मागवण्यात येणार असून सरकारने नव्याने प्रस्ताव तयार करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी आपण याविषयी चर्चा करेन. वाहतुक खात्याचे अधिकारीही या विषयी अभ्यास करतील मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत होऊन याविषयावर अंतीम तोडगा काढण्यात येईल अशी माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.