प्रतिनिधी/ वास्को
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉकडाऊननंतर गोव्यात अडकलेल्या हजारो विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवणी करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत 2638 पर्यटकांनी भारताचा निरोप घेतलेला असून काल शनिवारी दोन विमानांद्वारे 294 विदेशी पर्यटकांनी मायदेशी प्रयाण केले. या पर्यटकांच्या परत पाठवणीसाठी खास विमानांची सोय सरकारने केलेली आहे. ही सेवा सर्व पर्यटक मायदेशी रवाना होईपर्यंत चालूच राहणार आहे.
लॉकडाऊननंतर गोव्यात हजारो विदेशी पर्यटक अडकून पडले होते. त्यांचे हवाई मार्ग बंद झाल्याने अखेर त्यांच्या मदतीसाठी सरकारने खास हवाई सेवांची सोय केली. या विदेशी पर्यटकांनी आपापल्या वकिलातीशी मदतीसाठी संपर्क साधल्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या समस्येत लक्ष घालून त्यांना परत पाठवण्यासाठी लगबगीने सोय केली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून दररोज विविध देशातील पर्यटक शेकडोंच्या संख्येने या सेवेचा लाभ घेत दाबोळी विमानतळावरून मायदेशी प्रयाण करीत आहेत. या पर्यटकांमध्ये यु.के. रशिया, इस्त्रायल, जुकोस्लावीया, जर्मनी, इटली, पोलंड, कझाकीस्तान व इतर देशातील प्रवाशांचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर जवळपास तीन हजार विदेशी पर्यटक गोव्यात अडकल्याचा अंदाज होता. आतापर्यंत 2638 पर्यटकांची रवानगी करण्यात आलेली आहे. त्यांना दरदिवशी खास सेवेव्दारे परत पाठवण्यात आले. सर्व पर्यटकांना त्यांच्या देशात रवाना करीपर्यंत ही खास हवाई सेवा चालूच राहणार आहे.
लॉकडाऊन काळातही खास पाहुण्यांच्या प्रयाणासाठी विमानतळ कर्मचाऱयांची सेवा
विशेष म्हणजे दाबोळी विमानतळ सध्या देशी विदेशी हवाई उड्डाणांसाठी बंद असल्याने विमानतळावरील सर्व व्यवहार ठप्प झालेला आहे. मात्र, या विदेशी पर्यटकांच्या परत पाठवणीच्या कर्तव्यासाठी संध्याकाळी, रात्री व पहाटेही उपलब्ध मर्यादित कर्मचाऱयांनी सेवा दिली. या पाहुण्यांना कठीणसमयीही आनंदात निरोप दिला. ही कामगीरी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असून मायदेशी रवाना होणारे पर्यटक या सेवेबद्दल दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलीक व त्यांच्या कर्मचाऱयांचे अभार मानीत असतात. या पर्यटकांची परत पाठवणी करताना सामाजीक अंतर पाळण्याची काळजी त्यांनी घ्यावी यासाठीही विमानतळ प्राधिकरण दक्षता बाळगीत आहे. शिवाय त्यांना घेऊन उड्डाण करणाऱया विमानतही हीच काळजी घेण्यात येत आहे. या प्रवाशांचे उड्डाणापूर्वी थर्मल स्कॅनिंगही करण्यात येत आहे.
आतापर्यंत 15 हवाई सेवांद्वारे 2638 पर्यटकांची रवानगी
गुरुवारी दाबोळी विमानतळावरून दोन विमानांतून एकूण 192 पर्यटकांनी मायदेशी प्रयाण केले होते. शुक्रवारी तीन विमानांतून एकूण 307 पर्यटकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली होती. तर काल शनिवारी दोन विमानांतून 294 पर्यटकांनी विविध देशांकडे प्रयाण केले. आतापर्यंत दाबोळी विमानतळावरून 15 खास हवाई सेवांव्दारे जगातल्या विविध देशातील 2638 प्रवाशांनी मायदेशी प्रयाण केलेले आहे. या पर्यटकांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता.