गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात नागरी स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने 75 वर्षांपूर्वी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी त्याविरुद्ध आवाज उठविला होता. आज गोव्यात तीच स्थिती आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही नागरी स्वातंत्र्याची अशीच गळचेपी करत आहेत. कुणी सरकारवर टीका केली, तर ती गोव्याची बदनामी असे त्यांना वाटते, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
75 व्या गोवा क्रांतिदिनी ऐतिहासिक लोहिया मैदानावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 75 वर्षांपूर्वी याच मैदानावरून डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांनी सालाझाराच्या हुकूमशाहीच्या विरोधात नागरी उठावासाठी चळवळ सुरू केली होती. आज पुन्हा अशी चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचे सरदेसाई म्हणाले.
विरोधी मत ही लोकशाहीची गरज असून कुणी ते दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. मात्र सावंत सरकारच्या राज्यात आवाज उठविणाऱया महिलांना बुटाखाली चिरडले जाते, मुलांना अटक होते आणि लोकांकडे सतत दुर्लक्ष होत आहे. गोवेकरांना नागरी स्वातंत्र्य मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य नव्हे का, असा प्रश्न त्यांनी केला. सध्या गोव्यात लोकांचा आवाज ज्या प्रकारे दाबला जातो ते पाहिल्यास 1946 ची स्थिती आणि आजची स्थिती यात काही फरक जाणवतो का, असा सवाल त्यांनी केला.
किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आराखडा सुनावणी, शांततेत चाललेले मोले आंदोलन, म्हादई प्रश्न आदी हाताळताना सावंत सरकारने नागरी स्वातंत्र्याची पूर्णपणे गळचेपी केली आहे. लोकांचा आवाज दाबला गेला. मात्र या साऱयांची उत्तरे द्यावी लागतील याची सरकारने जाणीव ठेवावी, असे सरदेसाई म्हणाले. गोवा क्रांतिदिनाच्या अमृतमहोत्सवी क्षणी बोलताना गोवेकरांनी मुक्तीलढय़ापासून प्रेरणा घेत 2022 साली या सरकारच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 2022 हे वर्ष गोव्याची नवी ओळख करून देणारे असेल, असे ते म्हणाले.