अखिल गोवा मराठी साहित्य संमेलनात सूर व्यक्त
प्रतिनिधी /मोरजी
मराठी साहित्य विश्वामध्ये गोमंतकीय साहित्याची नाममुद्रा उमटवण्यासाठी कथा कादंबरी कविता, बालसाहित्य यामध्ये अधिक दर्जेदार आणि सकस साहित्य निर्मिती व्हायला हवी असा सूर पेडणे येथील साहित्य संमेलनात व्यक्त करण्यात आला. ‘2000 नंतरचे गोमंतकीय मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात बोलताना व्यक्त केले.
परेश प्रभू यांच्या अध्यक्षतखालील परिसंवादात पत्रकार तथा कवि राजू भिकारो नाईक (बाल साहित्य), प्रा. विनय बापट (कादंबरी), प्रा. जयप्रभू कांबळे (कथा), प्रा. अरुण नाईक (कविता) यांनी भाग घेतला.
बालसाहित्याचा प्रसार व्हायला हवा : नाईक
बालसाहित्य ज्या प्रदेशात चांगले असेल तिथून सर्व प्रकारच्या चांगल्या वाङमयाची निर्मिती होत असते. बालपणी बालसंस्कार महत्वाचे आहे ,संख्यात्मक आणि गुणात्मक बालसाहित्याचा विचार केल्यास ते खूप कमी आहे ,कोरोना काळात मानसिक स्थिती ढासळली होती, तरी गोव्यात या काळात बाल साहित्याची निर्मिती झाली आणि बालांगण हा ऐतिहासिक बालकाव्यसंग्रह निर्माण झाला. गोव्यातील बालसाहित्य संख्यात्मकदृष्टय़ा कमी असले तरी ते उत्कृष्ट संस्कार करणारे निश्चितच आहे. रामायण महाभारतातील संस्कारक्षम गोष्टी गोव्यातील बालसहित्यात आहेत. बाल साहित्य प्रत्येक घरांत, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये पोहोचायला हवे. ग्रंथालयांमध्ये बालसाहित्याचा खास विभाग असावा. व्हॉटसॅप, पेसबुक व अन्य आधुनिक व्यासपीठांचा वापर बालसाहित्य निर्मितीसाठी व प्रसारासाठी करायला हवा असे सांगून नाईक यांनी ‘श्यामची आई’ ने जशी क्रांती केली तशी क्रांती आता बाल साहित्यातून व्हायला हवी, असेही ते म्हणाले. आई वडिलांवर प्रेम सहित्यातून दिसते ते प्रत्यक्ष दिसावे असे ते म्हणाले.
गोव्याची कविता समृद्ध होत आहे : नाईक
यावेळी अरुण नाईक गोव्यातील कविता साहित्याच्या दृष्टीने बोलताना म्हणाले की गोव्यात चांगल्या कवींची संख्या कमी असल्याने खंत वाटले. शेकडो काव्य संग्रह तयार होत आहे ,समाज आणि साहित्य यांचे संबंध घट्ट असतात ,बदलणाऱया काळाचा अचूक वेध घेणारे हेच साहित्य विपुल असते. मराठीचे साहित्य काळालानुसार बदलत गेले , गोमंतकीय कवींची कुणी तळी त्या काळात उचलून धरली नाही. महाराष्ट्र भागातील शिक्षक, प्राध्यापक गोव्यात आले तेच बाहेरच्या साहित्यावरच गोव्यात विचार करायचे. 21 व्या शतकात साहित्य समृद्ध होताना दिसत आहे, बदलती समाज माध्यमे याचाही बदल साहित्यावर होत असल्याचे दिसून येते. गोव्यातील 2000 नंतरची कविता कृतिशील ठरत आहे. पुरुष संस्कृतीवर हल्ला करणारी आहे. मात्र मानवी नात्यान होणारे बदल हे शोध घेणारे विषय या कवितेत आले आहे का असा प्रधान अरुण नाईक यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या तोडीचे साहित्यिक सध्या गोव्यात तयार होत आहेत, असे ते म्हणाले.
गोव्याच्या कथेत जागतिक बदलाचे चित्रण : कांबळे
जयप्रभु कांबळे यांनी कथेवर बोलताना ,आशय आणि तंत्र यात बदल झालेली कथा आपल्याला दिसून येते, असे सांगितले. जागतिक बदलाची कथा आज दिसते, गोव्याचा चेहरा जागतिक वातावरणातून बदलला असून त्याचे चित्रण साहित्यात येते आहे. किनारी गैर संस्कृती, वाढती सिमेंट जंगले दिसून येते. नारायण महाले यांच्या कथेतून खेडे आणि शहर यावर आधारित आणि संस्कृतीवर झालेला परिणाम या कथेवरून दिसून येतो . दयाराम पाडलोस्कर यांनी माध्यवरथी कथेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आहे .
विनय बापट यांनी कादंबरी या विषयावर बोलताना गोमंतकीय साहित्य कुठे आहे, याचा विचार मांडून व्यक्तिवादी कादंबरी ,दलित लेखक , व वास्तव्य यावर लेखन होत असल्याचे नमूद केले. मानवी मूल्य हातात पैसा आला की ती उद्ववस्त होतात याचे चित्रण गोव्याच्या कादंबरीमध्ये पहायला मिळते. मानवी संबंध पैश्यामुळे कसे बदलतात हे कादंबरीच्या माध्यमातून दिसून येते .ग्रामीण भागातील स्त्री लेखिका कादंबरी का लिहित नाही असा सवाल बापट यांनी उपस्थित केला.
शेतीची बागायतींची स्थिती कादंबरीत गोमंतकीय का लेखन करत नाही असा प्रश्न उपस्थित केला. संवेदना व भाषा हरवत चालली आहे का अशी भीती व्यक्त केली.
परिसंवादाच्या सुरुवातीलस शांती किनळेकर , ,स्मिता आंबेकर आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वकील व्यंकटेश नाईक यांनी परिसंवादाचे प्रास्ताविक, मान्यवर वक्त्यांचा परिचय, सूत्रसंचालन केले.