भाजपच्या पाठपुराव्यास यश
वेंगुर्ले/ वार्ताहर-
वेंगुर्ले तालुक्यातून रोजगारासाठी गोव्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना सोमवार दि २ ऑगस्ट पासून वेंगुर्ले आगारातून सकाळी ६.३० वाजता बस फेरी सुरू करण्याचा निर्णय वेंगुर्ले आगाराने घेतला आहे. सदर बस फेरी सुरू करण्यासाठी वेंगुर्ले भाजपाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मागणी केली होती.
गोवा राज्यात रोजगारासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेकडो युवक – युवती रोज ये – जा करतात. परंतु लाॅकडाऊन च्या काळात सीमेवरील निर्बंधांमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. काहीजण प्रसंगी चोरमार्गाचा अवलंब करून नोकरी साठी जात होते. त्यातच अनेक अपघात घडले.
ज्यांच्या जवळ दुचाकी होती ते युवक – युवती महाराष्ट्र हद्दीत सातार्डा येथे आपली दुचाकी पार्ककरुन पुलावरून चालत जाऊन गोवा राज्यात बस च्या माध्यमातून नोकरीला जात होते. परंतु सध्याच्या पावसाळी दिवसात त्यांना फार त्रास सहन करावा लागत होत. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सातत्याने गोवा येथे नोकरी निमित्त जाणाऱ्यांसाठी एस्. टी. ची वाहतुक सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती व एस्. टी.ची वाहतुक सुरु केली नाहीतर प्रसंगी आंदोलन करु असा इशारा एस्. टी.प्रशासनाला दिला होता.
या मागणीची दखल घेत एस. टी.महामंडळाने सोमवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ६. ३० वाजता वेंगुर्ले आगारातून सातार्डा पर्यंत फेरीची घोषणा केली आहे. तसेच ती गाडी तिकडेच थांबवून संध्याकाळी ७ वाजता सातार्डा येथुन वेंगुर्ले येथे रवाना होणार आहे. नोकरी निमित्त व कामाधंद्यासाठी जाणाऱ्या वेंगुर्ले वासीयांनी या एस. टी.सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.