मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या विकासकामांपुढे विरोधकांचे गठबंधन टिकणार नाही. या निवडणुकीत भाजप 22पेक्षा अधिक जागा जिंकून पूर्ण बहुमतात परत सरकार घडविणार आहे. ही निवडणूक काही जणांची अखेरची असून काही पक्षांचे अस्तित्व संपणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि सरचिटणीस नरेंद्र सावईकर उपस्थित होते. भाजप निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या पन्नास वर्षांत जेवढी विकास कामे झाली नव्हती, तेवढी या भाजपच्या सरकारच्या काळात झाली आहे. सर्व क्षेत्रातील साधनसुविधांचा विकास झाला व त्यासाठी केंद्र सरकारने भरमसाठ मदत केली, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने पाठविलेला निधीपैकी 96 टक्के निधी वापरला गेला, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रशासन व विकास कामाची गती पाहता संपूर्ण भारतात गोव्याचा तिसरा क्रमांक आहे. गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव आणि आझादीचा अमृत महोत्सव एकत्र साजरा करताना केंद्राने केलेल्या मदतीचा अधिक लाभ झाल्याचे म्हणाले.
गोव्याचा सांस्कृतिक विकास घडविण्यासाठी आपले सरकार कार्यरत राहिले तसेच स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत योजना शंभर टक्के यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. स्वयंपूर्ण मित्रांमार्फत योजना जनतेपर्यंत पोचविण्यात आल्या. या कार्याची दखल पंतप्रधानांनी घेतली. अभिनंदन करून पाठ थोपटली. तसेच 100 टक्के लसीकरण शक्य झाल्याने पंतप्रधानांकडून मिळालेली शाबासकी स्फूर्ती देणारी ठरली, असे ते म्हणाले.
मोपा विमानतळ 15 ऑगस्टला होणार खुला
मोपा विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून कुठल्याही परिस्थितीत येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी या विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
उमेदवारी केंद्रांतून जाहीर होणार!
भाजप राज्य निवडणूक समिती उद्या जाहीर केली जाईल. या समित्यांचा अहवाल केंद्रीय समिती म्हणजे पार्लेमेंट्री बोर्डला जाणार व त्यानंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्लीतून होणार, अशी माहिती तानावडे यांनी दिली. निवडणूक अर्ज भरणे 21 जानेवारी पासून सुरू होणार, असे ते म्हणाले.
राज्याची आर्थिक स्थिती स्थिर!
गोव्याने 600 कोटी रुपयांचे कर्ज घेतले व ते चुकतेही केले. नाबार्डचे कर्ज 2.5 टक्के दराने राज्याला मिळते. ते फक्त 65 कोटी कर्ज एवढेच होते. यंदा 500 कोटी कर्ज मिळाले. राज्य सरकार 700 कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकते. कर्ज घेतले तरी सामाजिक कल्याण योजना व साधनसुविधा विकास थांबविण्यात आला नाही, असे ते म्हणाले. कोरोनावर मोफत उपचार देणारे गोवा हे एकमेव राज्य असून खासगी इस्पितळातही मोफत उपचार झाल्याचे ते म्हणाले. दोन लाख एक्सग्रेरिया रक्कम देणारे गोवा हे एकमेव राज्य ठरले आहे.
पारंपरिक व्यावसायिकांना पाच हजार रु.
पारंपरिक व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये यापूर्वीच मंजूर झाले असून 35 हजार व्यावसायिकांच्या बँक खात्यात ते जमा होणार आहेत. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मंजुरी मिळाल्याने ते वाटण्यास कोणतीच हरकत नसल्याचे ते म्हणाले.
दीड लाख रेशनकार्डावर साडेपाच लाख लोकांना पाच किलो राशन गेले दीड वर्षे मोफत दिले जाते. सदर योजना 98 टक्के पूर्ण करण्याचा मान गोव्याला मिळाला. कृषीकार्ड फक्त जमीन असलेल्या शेतकऱयांनाच नव्हे तर दूध उत्पादक आणि मत्स्योद्यकांनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत 80 वेगवेगळय़ा खात्याच्या योजना सुरू झाल्या, त्यातील 63 योजना लोकांपर्यंत पोचविल्या, असे ते म्हणाले.
पर्रीकरांची उणीव भासणार!
मनोहर पर्रीकर यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर ही विधानसभा निवडणूक लढविली जणार. त्यांची उणीव सदोदित भासत राहणार पण सरकारच्या विकासकामांच्या आणि संघटन शक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकली जाईल, असे तानावडे यांनी सांगितले. काही जणांना आमदारांवर रोष असेल पण त्यांनी वैयक्तिक मतदान न करता पक्षाला मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.