मंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार
प्रतिनिधी/ फोंडा
फिजिओथेरेपी ही वैद्यकीय क्षेत्रातील उपशाखा राहिली नसून ती मुख्य शाखा बनली आहे. अपघात व अन्य दुखण्यांवर आश्वासक उपचार म्हणून आज त्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय क्षेत्रात असाध्य ते साध्य करण्याची क्षमता बाळगणाऱया फिजिओथेरेपी क्षेत्रात गोव्यातील विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यासाठी सरकारने यापुढे फिजिओथेरेपी शाखेत अधिक जागा उपलब्ध कराव्यात तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण व आधुनिक पद्धतीच्या साधनसुविधा निर्माण कराव्यात. आपण आरोग्य खात्याकडे हा विषय प्राधान्य क्रमाने मांडणार आहे, अशी घोषणा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केली.
फोंडा येथील मिनीनो एक्झिक्युटिव्ह सभागृहात भरलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय युवा फिजिओ परिषदेच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. दि युथ फिजिओ ब्रिगेड व डॉ. केतन भाटीकर्स स्पार्क यांच्या संयुक्त सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यातून साधारण सहाशे फिजिओथेरेपी प्रशिक्षणार्थी व तज्ञ त्यात सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळय़ाला मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओ डॉ. अली इराणी, केएलई अकादमी उच्च शिक्षण व संशोधन या संस्थेचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार, फिजिओथेरेपी तज्ञ रुची वासने, संजय गांधी फिजिओथेरेपी महाविद्यालय बंगळूरचे प्राचार्य डॉ. साईकुमार एन. डॉ. केतन भाटीकर, कामाक्षीदेवी होमियोपॅथी कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती शिरवईकर, आशुतोष खांडेकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
फिजिओथेरेपी या उपचार पद्धतीबद्दल रुग्णांमध्ये विश्वसनीयता वाढत आहे. आपण स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. गोव्यात फिजिओथेरेपीला अधिक गतीमान बनविण्यासाठी डॉ. केतन भाटीकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे, असे गौरवोद्गारही मंत्री फळदेसाई यांनी काढले.
डॉ. केतन भाटीकर यांचे कार्य उल्लेखनीय ः दिगंबर कामत
आमदार दिगंबर कामत म्हणाले, फिजिओथेरेपी ही आज क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नसून विविध आजार व दुखण्यावर खात्रीशीर उपचार म्हणून त्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांची ती गरज बनू लागली आहे. केंद्रात मोदी सरकारने फिजिओथेरेपी काऊसिंल सुरु करुन या उपचार पद्धतीला मुख्य प्रवाहात आणले आहे. गोवा सरकारनेही आता फिजिओथेरेपी शिक्षण व उपचार अधिक विकसित होतील यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गोव्यात फिजिओथेरेपी क्षेत्रात डॉ. केतन भाटीकर यांचे कार्य उल्लेखनीय असून भविष्यात त्यांच्या उल्लेखाशीवाय या क्षेत्रात पुढे जात येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
असाध्य ते साध्य करण्याची क्षमता फिजिओथेरेपीत ः डॉ. भाटीकर
डॉ. अली इराणी, डॉ. केतन भाटीकर, डॉ. संजीव कुमार, रुची वासने व या क्षेत्रातील अन्य तज्ञांनी आपले विचार मांडले. फिजिओथेरेपीची गरज आज विविध क्षेत्रांना भासू लागली आहे. भूकंप किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींच्यावेळी आपत्त्कालीन व्यवस्थापनामध्ये फिजिओथेरेची उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. प्रत्येक खेळ प्रकारात आज फिजिओथेरेपी अविभाज्य बनली असून लहान मुलांपासून गरोदर महिलांसाठीही ती मार्गदर्शक ठरत आहे, असे डॉ. अली यांनी सांगितले. असाध्य ते साध्य करण्याची क्षमता फिजिओथेरेपीमध्ये असून ते परिपूर्ण उपचारशास्त्र असल्याची मान्यता आता भारत सरकारने दिली आहे. या क्षेत्रात नव्याने येणाऱया डॉक्टर्सनी आपल्या सांघिक प्रयत्नातून फिजिओथेरेपीला अधिक उंचीवर नेण्याचे आवाहन त्यांनी केले.