आकेरीतील रुग्णाला अनुभव
वार्ताहर / सावंतवाडी:
जिल्हावासीयांना आरोग्य सेवेसाठी गोवा-बांबोळी रुग्णालयावरच अवलंबून राहवे लागत आहे. कोरोना काळात गोव्याच्या सीमा बंद होत्या. आता त्या खुल्या झाल्याने जिल्हय़ातून उपचारासाठी तेथ रुग्ण जातात. मात्र, तेथे रुग्णसंख्या वाढती असून बेड उपलब्ध नसल्याने अक्षरश: खुर्चीवर ठेवूनच उपचार केले जात आहेत.
जिल्हय़ात गंभीर रुग्ण असेल तर गोव्याला पाठविला जातो. गेली अनेक वर्षे हे चित्र आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, तपे प्रत्यक्षात येण्यासाठी काही वर्षे जाणार आहेत. त्यामुळे सध्या गोव्याशिवाय पर्याय नाही. मात्र, गोवा-बांबोळी हॉस्पिटलमध्ये गोव्यातील स्थानिक रुग्णसंख्या वाढती असल्याने सिंधुदुर्गातील रुग्णांना खाटा (बेड) मिळणे कठीण होत आहे. खुर्चीवरच ठेवून रुग्णांवर उपचर करण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ातील अनेक रुग्णांना असा अनुभव येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मनस्ताप होत आहे.
कोरोना पेशंट वगळता सर्पदंश, अपघात व अन्य रुग्णांना गोव्यात पाठविले जाते. तेथे कोरोना टेस्ट केली जाते. मात्र, बेड नसल्याने खुर्चीवर बसवूनच उपचार केले जात आहेत.
आकेरीतील परब नामक व्यक्तीला सर्पदंश झाला होता. त्यांना सावंतवाडी कुटिर रुग्णालयातून गोवा-बांबोळीला हलविण्यात आले. तेथे बेड न मिळाल्याने साध्या खुर्चीवर 55 वर्षाच्या व्यक्तीला 24 तास ठेवून उपचार केले गेले. नातेवाईकांना बसायलाही जागा मिळत नव्हती. जमिनीवर बेड द्यायलाही हॉस्पिटल हतबल होते. महात्मा गांधी आरोग्य योजनेचा लाभही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे रुग्णांना गोव्यात पाठविण्यापेक्षा जिल्हय़ातच उपचार करावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे.