वाहतुकीसह कार्यालये, उद्योग, सर्व व्यवहार सुरळीत
प्रतिनिधी/ पणजी
काल मंगळवारी शेतकऱयांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’चा गोव्यातील जनजीवनावर कोणताही परिणाम झाला नाही. वाहतूक, सरकारी-खासगी कार्यालये, बँका, उद्योग, व्यवसाय व इतर व्यवहार नियमितपणे सुरू होते. कदंब परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ाही सुरू होत्या. कोठेही कोणीही वाहतूक अडवली नाही. जनतेने देखील आपापली वाहने रस्त्यावर आणून दैनंदिन कामे केली. त्यामुळे गोव्यात बंदला कोणच प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यात हा बंद पूर्णपणे फसला. राज्यातील विरोधी पक्षांनी या भारत बंदला उघडपणे पाठिंबा दिला होता. परंतु राज्यातील जनतेने मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही.
राज्यातील खासगी कार्यालये देखील नेहमीप्रमाणे सुरू होती. विरोधी पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले होते, परंतु जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. गोव्यात या बंदचा फज्जा उडाला आणि फारसा गवगवाही नव्हता. त्यामुळे तो कोणीच फारसा गंभीरतेने घेतला नाही.
गोव्यातील शेतकरी संघटनांचाही सहभाग नाही
गोव्यातील शेतकरी संघटना यांनीही बंद यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही, उलट त्याकडे दुर्लक्षच केले. गोव्याच्या सीमांवरही बंदचे परिणाम झाले नाही. राज्यातील सर्व शहरे व ग्रामी भागात या बंदचा प्रभाव दिसलाच नाही.
राज्यातील शेतकरी विधेयकांच्या विरोधात नाही : भाजप
भारत बंदचा गोव्यात फज्जा उडाला असून गोव्यातील शेतकऱयांनी त्यास पाठिंबा दिला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने शेतकऱयांसाठी जी विधेयके मंजूर केली आहेत त्या विरोधात शेतकऱयांनी आणि इतर राजकीय पक्षांनी बंद पुकारला होता. राज्यातील शेतकरी त्या विधेयकांच्या विरोधात नाहीत ते स्पष्ट झाले असून ती विधेयके शेतकऱयांच्या हितासाठीच आहेत, असा विश्वास त्यांना आहे. म्हणून गोव्यातील शेतकऱयांचा बंदला प्रतिसाद मिळाला नाही. त्या शेतकऱयांचा केंद्र सरकार, पंतप्रधान तसेच भाजपवर पूर्ण विश्वास आहे तसेच गोव्यातील शेतकऱयांचा विधयेकास पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते, असे भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले आहे.
आझाद मैदानावर राजकीय पक्षांची निदर्शने
येथील अझाद मैदानावर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱयांनी निदर्शने केली यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऍड. अविनाश भोसले, कामगारनेते ख्रिस्तोफर फॉन्सेको, क्लाऊड आल्वरीस, ऍड. जतीन नाईक तसेच विविध पक्षांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱयांचे नव्हे, भांडवलदारांचे भले होणार : कामत
नव्या कृषी कायद्यांचा शेतकऱयांना कोणताही फायदा होणार नसून उलट नुकसानच होणार आहे. या कायद्यामुळे केवळ भांडवालदारांचेच भले होणार असून शेतकरी भरडला जाईल. कालांतराने भांडवलदार शेतकऱयांच्या जमिनीही ताब्यात घेतील, अशी भिती निर्माण झाली असल्याचे दिगंबर कामत म्हणाले.
शेतकऱयांना देशभरातून चांगला पाठिंबा : फोन्सेको
आज शेतकऱयांवर झालेल्या अन्यायाविरोधात शेतकऱयांनी देशव्यापी बंद पुकारलेला आहे. त्यांना सर्व घटकातून पाठिंबा मिळत आहे. शेतकऱयांचे आंदोलन हे केवळ शेतकऱयांचेच नाही तर ते प्रत्येक भारतीयाचे आहे, असे कामगारनेते फॉन्सेको यांनी सांगितले.
गोव्यातील शेतकऱयांवर परिणाम होणार नाही : सरदेसाई
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याचा गोव्यातील शेतकऱयांवर तसा परिणाम होणार नाही, कारण गोव्यातील शेती पध्दती वेगळी आहे. मात्र शेतकऱयांच्या संपामुळे शेतकऱयांनी केंद्र सरकारला दाखवून दिले आहे की सरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.
धरणे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर पक्षांच्या पदाधिकाऱयांनीही समयोजीत विचार मांडले व भाजप सरकारवर टीका केली.