एमटीपी बंदरात उतरविण्याची तयारी
प्रतिनिधी / पणजी
मुंबईत बोटीवरुन उतरविलेले गोमंतकीय खलाशी गोव्यात येताच त्यांची चाचणी 24 तासांच्या आत पूर्ण करण्याची तयारी सरकारने केली आहे. त्याचबरोबर या चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना बोटीवरच ठेवले जाणार आहे. खलाशांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
खलाशी गोव्यात पोहोचताच त्यांची चाचणी केली जाणार आहे. सरकारने याबाबत आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. चाचणी प्रक्रियेवर आरोग्य सचिवांची देखरेख राहणार आहे.
मुंबई बंदरात तिन्ही बोटींवरील खलाशांना उतरवून घेतले आहे. तेथे त्यांची चाचणीही झाली आहे. काही खलाशांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मारेला डिस्कव्हरी, कर्णिका व आंग्रिया या तीन बोटींवर मिळून गोव्यातील 189 खलाशी आहेत. सरकारने आता या खलाशांना गोव्यात आणण्याची तयारी चलविली आहे. खलाशांचे कुटुंबीयही आतुरतेने त्यांची वाट पाहत आहे. खलाशीही आपल्या मायभूमीत पाय ठेवण्यासाठी आतूर बनले आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून खलाशांनी व्हिडीओ बनवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
खलाशांना एमटीपी बंदरात उतरविण्याची तयारी केल्याने एमटीपीची पाहणीही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.