प्रतिनिधी /पणजी
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा प्रयोग उत्तमरित्या होत असून गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत होते. मात्र काँग्रेसने ऐनवेळी नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी शिवसेनेचे संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड, गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोव्यात राष्ट्रवादी 1999पासून आहे. विल्प्रेड डिसोझा हे पहिले उमेदवार होते. 2012पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षासोबत युती करून निवडणूक लढविली. गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये आमची निर्णायक भूमिका राहणार आहे. आम्ही उमेदवारांची यादी उद्यापासून तयार करण्यास सुरूवात करत असून त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून काँग्रेसबरोबर युतीसंबंधी चर्चा करत आहोत. याशिवाय जागा वाटपाबाबत आम्ही त्यावर चर्चाही करत आहोत. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही आम्ही महाविकास आघाडीचा प्रयोग सफल करण्यासाठी तयार आहोत. सत्तेमध्ये असणाऱया भाजपला धडा शिकविण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही गोव्यातील जनतेसाठी एक सक्षम सरकार बनविण्यासाठी एकत्र आलो आहोत असे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार उत्तम पद्धतीने सुरू आहे. गोव्यात आम्ही निवडणूकपूर्व काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी तयार आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने निर्णय घेतला आहे की, गोव्यात आम्ही एकत्र लढणार आहोत. विशेष म्हणजे आमच्याशिवाय गोव्यात सरकार बनू शकत नाही. गोव्यातही पहिल्यांदाच तृणमूल पक्ष विधानसभा निवडणूक लढवित आहे. गोव्यातील जनता शहाणपणाने यावेळी मतदान करणार आहे. या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मिळून जाहीरनामा असणार आहे. गोव्यातील जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे याचा विचार करून हा जाहीरनामा असणार आहे. ड्रग्जच्याबाबतीत आम्ही कुणालाही सोडणार नाही. कॅसिनोच्या संदर्भात आता आमच्याकडे धोरण नाही. मात्र आम्ही सत्तेमध्ये आल्यास त्यासंबंधी धोरणही बनवू. आमच्याशिवाय महाराष्ट्रात सरकारमध्ये ते येऊ शकले असते का याचा विचार काँग्रेसला विचार करावा लागणार आहे असे राऊत यांनी सांगितले.
काँग्रेसशिवाय सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गोवा विधानसभा निवडणूक लढणार असून 40 जागा लढणार नसलो तरी जेवढय़ा जागा लढू त्या पूर्ण जिंकू असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.