भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विश्वास : ‘तरुण भारत’शी वार्तालाप
पणजी / प्रतिनिधी
गोव्यात गेल्या 10 वर्षात मोठय़ा प्रमाणात विकास झाला आहे. आता गोमंतकीयांचे राहणीमान, स्तर उंचावण्यासाठी भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरी जात आहे. काँग्रेसच्या राजवटीत राज्याचा विकासाचा स्तर खूपच खालावला होता, तो उंचावण्याचे काम आम्ही केले. आम्ही कमी कालावधीत खूप मोठा पल्ला गाठला असून अजून खूप कामे करायची आहेत. गोव्यात आम्ही स्वबळावर 22 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांच्याशी वार्तालाप करताना व्यक्त केला.
आमच्या पक्षात येणारे उमेदवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नीतीवर आणि कामावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. पंतप्रधानांच्या टॅलेंटला त्यांचा पक्ष महत्व व आदर देत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कामातून सिद्ध होण्यासाठी मंच उपलब्ध करून देत आहोत, असे नड्डा म्हणाले.
पक्षाच्या विचारधारेशी जळवून घेणाराच टिकतो
पुढे बोलताना ते म्हणाले की, कोण्या दुसऱया व्यक्तीने पार्टीत प्रवेश केल्याने पार्टीची विचारधारा बदलत नाही. जो विचारधारेशी जुळवून घेईल तोच इथे राहील. अन्यथा तो बाहेर फेकला जाईल हे निश्चित आहे. आम्ही विचारधारा मानत असल्याने तिच्याशी कधीही प्रतारणा करत नाही किंवा बाजूला ठेवलेली नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबद्दल बोलताना नड्डा म्हणाले की, आम्ही कायदा मानणारे लोक असून आमचा कायद्यावर व न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. उमेदवार व आमदारांवर असलेले आरोप हे पोकळ असून, ते गैरसमजातून केले गेले आहेत.
उत्पल, पार्सेकरांनी ऐकले नाही
उत्पल पर्रीकर यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले कि, मनोहर पर्रीकर हे आमच्यासाठी आदर्शस्थानी होते आणि कायम राहतील. उत्पल यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मी स्वतः तीन-तीन वेळा त्यांच्याशी बोललो आहे. पण त्यांनी ते ऐकले नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या बाबतीतही मी स्वतः त्यांना दिल्लीमध्ये बोलावून चर्चा केली होती. पण त्यांनीही ऐकलं नाही.
निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय
डॉ. प्रमोद सावंत हेच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहतील का? हे विचारलं असता ते म्हणाले की, जनतेने ठरवले आहे की पुन्हा भाजपाचे सरकार येणार. परंतु मुख्यमंत्री पदाबाबत आमचे संसदीय मंडळ निर्णय घेत असते. सध्यातरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. निकालानंतर आम्ही ठरवू की कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचं.
भाजपा सध्या महापालिका, जिल्हा पंचायत, विधानसभा या स्तरावरील सर्व निवडणूक पूर्ण ताकदीने आणि गंभिरतेने लढवितो. आमचा कार्यकर्ता 24 तास, 7 दिवस आणि वर्षाचे 365 दिवस काम करत असतो. त्यामुळे आम्ही जेवढय़ा ताकदीने उत्तर प्रदेशची निवडणूक लढवीत आहोत, तेवढय़ाच ताकदीने गोव्याची निवडणुकीला सामोरे जात आहोत. शेवटी खाण उद्योगावर बोलताना नड्डा म्हणाले की, आमचा हेतू शुद्ध आहे. परंतु हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने तो सुरु होण्यास विलंब लागत आहे.