दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ग्वाही : पणजीत महासभेला केले संबोधित.हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित
प्रतिनिधी /पणजी
राज्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यात आम आदमी पार्टी कटीबद्ध असून आपचा एकही आमदार फुटणार नाही याची शपथपत्रावर हमी प्रत्येक आमदार आपल्या मतदारांना देईल. काँग्रेस पक्ष पुरता संपला आहे. भाजपवर लोक प्रचंड नाराज आहेत, अशावेळी गोमंतकीयांकडे आप ही एकमेव आशा आणि पर्याय शिल्लक राहिला असून लोकांनी संधी दिल्यास सध्याच्या बुरसटलेल्या राजकारणापासून मुक्ती देतानाच स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचे जाहीर आश्वासन आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
मंगळवारी पणजीत आयोजित पक्षाच्या पहिल्या महासभेला संबोधित करताना ते बोलत होते. 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महासभेला राज्यातील प्रत्येक मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
सावंत सरकारात एकापेक्षा सरस ’नररत्ने’
गोव्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार तोफ डागली. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात एकेक नररत्ने भरलेली आहेत. त्यातील एकटा सेक्स स्कँडलमध्ये तर दुसरा बाल लैंगिक अत्याचारात गुंतलेला आहे. तिसरा कोटय़वधींच्या नोकऱया विकत आहे तर चौथा कोटय़वधींची टेंडरे परस्पर बहाल करण्यात मग्न आहे. पाचव्याने तर कहरच केला. कोरोना काळात व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, औषधांचे घोटाळे करून मृतांच्या टाळूवरील लोणीसुद्धा खाल्ले. सहाव्याने वीज घोटाळा केला, सातव्याने लेबर गेट घोटाळा केला, आठव्याने कचऱयातून घोटाळा केला. हे सर्व कमी म्हणून की काय या सरकारात कित्येकजण मटका किंग आहेत., आणि या सर्वांचा नेता म्हणजेच ’किंग ऑफ किंग’ जो केवळ अडीच वर्षांत गोव्यातील सर्वात मोठा ’भाटकार’ बनला. ही सध्यस्थिती पाहता गोवा म्हणजे ’फर्स्ट क्लास स्टेट विथ थर्ड क्लास पॉलिटिशियन्स’ असेच म्हणावे लागेल, अशी जोरदार टीका केजरीवाल यांनी केली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रतिसाद दिला.
गोव्यातील लोक खूप चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत, परंतु राजकारणी अत्यंत वाईट आहेत. त्यामुळे त्यांना चांगले राजकारणी मिळणे आवश्यक आहे. मुक्तीनंतरच्या 60 वर्षांच्या काळात गोव्याने 15 वर्षे मगोची सत्ता पाहिली, 27 वर्षे काँग्रेसची आणि पुन्हा 15 वर्षे भाजपची सत्ता पाहिली, परंतु या तिन्ही पक्षांनी भ्रष्टाचाराशिवाय गोव्याला काहीच दिले नाही. यावेळी बदल घडवून आणण्यासाठी गोव्याने ’आप’ला संधी द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
काँग्रेसचा आमदार ’स्टॉक क्लियरन्स’ सेल
मला राजकारण कळत नाही. त्यातल्या त्यात गोव्यातील राजकारण तर मुळीच समजत नाही. एका पक्षाचे सकाळी तीन आमदार असतात. संध्याकाळपर्यंत त्यातील एकाची विक्री होते व ती संख्या दोनवर येते. असे चित्र केवळ गोव्यातच दिसू शकते. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसच्या दुकानात 17 आमदार होते. त्यातील 15 ची विक्री झाली. आता त्यांच्या स्टोअरमध्ये दोनच आमदार शिल्लक आहेत. दोन महिन्यात हा साठाही संपेल, अशी टीकाही केजरीवाल यांनी केली. त्यावेळी उपस्थितांमधून हास्यकल्लोळ उठला.
अर्थसंकल्पातील सर्व पैसा राज्यासाठीच खर्च करणार
पुढे बोलताना केजरीवाल यांनी आता संपूर्ण व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. गोव्याचा अर्थसंकल्प 22 हजार कोटींचा आहे. परंतु यातील बहुतांश पैसा राज्यासाठी खर्च न होता राजकारण्यांच्या खिशात जातो. त्यामुळे लोकहितकारी योजनांसाठी सरकारकडे पैसा उरत नाही. आपचे सरकार आल्यास अर्थसंकल्पातील पै न पै राज्यासाठी खर्च करण्यात येईल, असे ते म्हणाले.
दिल्लीत आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. गोमंतकीयांना दिलेले प्रत्येक आश्वासनही पूर्ण करण्यात येईल, असे सांगून 24 तास मोफत वीज, तीर्थयात्रा, खाणकाम आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना बेरोजगारी भत्ता, प्रत्येक घरात रोजगार आणि मासिक भत्ता देण्याचे आश्वासन दिले.
भ्रष्टाचाऱयांना नुतनीकरण केलेल्या आग्वाद तुरुंगात पाठवणार : पालेकर
ऍड. अमित पालेकर यांनी विविध खात्यात सुरू असलेल्या कोटय़वधींच्या नोकरी घोटाळ्यावर जोरदार टीका केली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुतनीकरण केलेल्या आग्वाद तुरुंगाचे उद्घाटन केले आहे. आपचे सरकार आल्यास याच तुरुंगात या घोटाळेबाज मंत्र्यांना पाठविल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सावंत सरकारला थोडी लाज, शरम असेल तर त्यांनी नोकरी घोटाळय़ात सहभागी मंत्र्यांना बडतर्फ करावे असे पालेकर म्हणाले.
गोमंतकीयांनी ’आप’ला संधी द्यावी : म्हांबरे
गेल्या सहा वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या ’आप’ने तेथे कमालीचे बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रकल्पाचे जगभरातून कौतुक झाले आहे. आता असाच विकास गोव्यातही करायचा असून त्याची ’ब्लू पिंट’ तयार केली आहे. त्यासाठी गोमंतकीयांनी ’आप’ला सत्तेची संधी द्यावी, असे आवाहन राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केले.
भाजपकडून विकासाच्या नावाखाली राज्याचा विध्वंस : अलिना साल्ढाणा
प्रमोद सावंत यांच्या सरकारने विकासाच्या नावाखाली राज्याचा विध्वंस आरंभला आहे. जनतेला नको असलेले प्रकल्प त्यांच्या माथी मारण्यात येत आहेत. यातून गोवा, गोमंतकीय, श्रृष्टी, सौंदर्य, पर्यावरण, हे सर्व काही उद्ध्वस्त होणार आहे. अशा लोकविरोधी प्रकल्प आणि प्रकारांना प्राणपणाने विरोध केला म्हणुनच भाजपमधून आपणाला बाजूला सारण्यात आले, असा आरोप आप नेत्या अलिना साल्ढाणा यांनी केला. दुसरीकडे, दिल्लीत चाललेले कार्य आणि विकास हा पूर्णपणे सामान्य माणसाच्या फायद्यासाठी आहे. हे सर्व प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आनंद झाला. त्यामुळेच आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे त्या म्हणाल्या. व्यासपीठावर महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो, रामराव वाघ, विश्वजित राणे, सत्यविजय नाईक, वाल्मिकी नाईक, सिसिल ऱॉड्रिगीश, राजेश कळंगुटकर, वेन्झी व्हिएगश, बाबू नानोस्कर, पुती गावकर, सुरेल तिळवे, यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. राजदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.