1985 च्या विधानसभा निवडणुकीतील आठवण
संजीव खाडे / कोल्हापूर
ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्व आणि कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांवरही एन. डी. पाटील यांच्या संघर्षालाही लाल सलाम करण्यात आला. या साऱया वातावरणात एन. डी. पाटील यांच्यासाठी एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने नाकारलेल्या तिकिटाची अर्थात उमेदवारीही आठवण ताजी झाली. भाई संभाजीराव चव्हाण हे त्या नेत्यासाठी त्याग करणाऱया कार्यकर्त्याचे नाव.
कोल्हापूर शहर सत्तर, ऐंशी, नव्वदच्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचा अर्थात शेकापचा बालेकिल्ला होते. शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत तर फक्त आणि फक्त लाल बावटा दिसत असे. या तीन दशकांत शहरात निवडून गेलेले आमदार हे एखादा अपवाद वगळता डाव्या पक्षाचे म्हणजेच शेकापचे होते. शिवाजी पेठेत त्या काळी काँग्रेसची टोपी आणि काँग्रेसचा झेंडा लावण्याचे धाडस कुणीही करत नव्हते, एवढा शेकापच्या लाल झेंड्य़ाचा प्रभाव होत. नव्वदच्या दशकांत तर संभाजीराव चव्हाण, चंद्रकांत साळोखे, सुरेश साळोखे हे साळोखे बंधू आणि त्यांचे घराणे, देवासराव सूर्यवंशी, भारती पवार आदी मंडळींचा शेकापवर वरचस्मा होता. भाई विष्पूपंत इंगवले यांच्यासारखा उच्च शिक्षित बेडर, फर्डा वक्ता असणारा प्राध्यापकरूनी नेता होता. शेकापची ज्याला उमेदवारी तो आमदार हे समिकरण ठरले होते.
अशा वातावरणात 1985 च्या विधानसभेची निवडणूक लागली. काँग्रेसकडून त्यावेळी जनता पक्षाचे सरकार पडल्यानंतर आलेल्या 1980 मध्ये आलेल्या इंदिरा लाटेत निवडून आलेल्या लालासाहेब यादव यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. शेकापचा उमेदवार कोण? यावर चर्चा सुरू होती. प्रा. एन. डी. पाटील यांना उमेदवारी द्यावी, यासाठी एक गट आग्रही होता, तर भारती पवार यांच्यासाठी एक गट आग्रही होता. याचवेळी नगरपालिकेत कौन्सिलर आणि महापालिकेच्या पहिल्या सभागृहातील नगरसेवक असणारे शहर शेकपाचे चिटणीस, जिल्हा खजानिस, खंडोबा तालमीचे तत्कालीन अध्यक्ष आणि सिमालढय़ात सक्रिय असणाऱ्या संभाजीराव चव्हाण यांचे नाव अचानक पुढे आले. चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या मागणीने वेग धरला. पण शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते असणाऱ्या चव्हाण यांनी चक्क उमेदवारी नाकारत प्रा. एन. डी. पाटील यांना उमेदवारी द्यावी, आपण त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणू, असे स्पष्ट करत दिलेला शब्द पाळला. एन. डी. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत साळोखे, सुरेश साळोखे, भारती पवार आदी मंडळी नाराज झाली. त्यांनी शेकापच्या विरोधात बंडखोरी करत भारती पवार यांना उमेदवार म्हणून उभे करण्याचा निर्णय घेतला. पण मतदार यादीत भारती पवार यांचे नाव नसल्याने ऐनवेळी चंद्रकांत साळोखे म्हणजे चंदूभाऊ यांना उभे करण्यात आले. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. त्यावेळी स्वातंत्र्यसेनानी असणाऱ्या वसंतदादा पाटील यांची काँग्रेसच्या लालासाहेब यादव यांच्यासाठी प्रचार सभा झाली. वसंतदादांनी एन. डी. पाटील यांचे पार्सल सांगलीला पाठवा, काँग्रेसच्या यादवांना निवडून द्या असे आवाहन केले. पण कोल्हापूरकरांनी वसंतदादांचे आवाहन धुडकावून लावत एन. डी. पाटील यांच्या पारड्य़ात मताचे दान टाकत त्यांना निवडून दिले. निवडणूक काळात संभाजीराव चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळत एन. डी. पाटील यांचा प्रचार मनापासून केला. त्यांची 1965 मॉडेलची एमएच के 6663 नंबरची ऍम्बॅसिडरही प्रचारात गाजली. चव्हाण यांचे महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी घनिष्ठ संबंध असताना त्यांनी दिलेली काँग्रेस प्रवेशाची ऑफर संभाजीराव चव्हाण यांनी नाकारली होती.