निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची कोंडी, टीकाप्रहार
कोलकाता / वृत्तसंस्था
तृणमूल काँगेसचे युवक नेते बिनय मिश्रा यांच्या विरोधात गाईंची तस्करी केल्या प्रकरणी वॉरंट काढण्यात आले आहे. हा कोटय़वधी रूपयांचा घोटाळा असून त्याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. येथील सीबीआय न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे. मिश्रा बेपत्ता असल्याने ते काढण्यात आले, असे सांगण्यात आले.
हे तस्करी प्रकरण बाहेर आल्यापासून मिश्रा चौकशी टाळण्यासाठी बेपत्ता झाला आहे. त्याच्या निवासस्थानांवर आणि कार्यलयांवर धाडी घालण्यात आल्या असून त्याच्या भावाला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून त्याच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने या प्रकरणी आरोपपत्र सादर केले असून त्यात मिश्रा प्रमुख आरोपी म्हणून नमूद करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला होता. उत्तर भारतातील काही राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात गाई व गुरांची पश्चिम बंगालमध्ये आयात केली जात होती. त्यानंतर ही गुरे बांगला देशातील खाटिकखान्यांमध्ये विकली जात होती. हा सर्व व्यवहार बेकायदेशीरपणे करण्यात येत होता. याचा सूत्रधार बिनय मिश्रा हा असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. काही वर्षांपीर्वी तृणमूल काँगेसमध्ये त्याने प्रवेश केला होता. त्याला लगोलग पक्षाच्या युवक आघाडीचे प्रमुख पद देण्यात आले होते. त्याच्यावरील धाडींमध्ये महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगण्यात आले. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तृणमूलचे संरक्षण ः भाजपचा आरोप बिनय मिश्रा याने गुरांच्या अवैध तस्करीतून अमाप पैसा कमावला असून त्यामुळेच त्याला तृणमूल काँगेसमध्ये महत्वाचे पद देण्यात आले आहे. तृणमूलला त्याच्या पैशाची आवश्यकता असल्याने त्याला पक्षाच्या काही नेत्यांनी संरक्षण दिले आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.