प्रतिनिधी/पणजी
गोवा सुरक्षा मंच(गो.सु.म)ने नेहमीच म्हादईचा विषयाला सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले. हल्लीच कुणीतरी विधान केले होते की मगो पक्षाने म्हादई विषयी जागृती सुरु केली होती, परंतु 2018 सालापासून आम्ही विविध टप्प्यांमधून म्हादईसाठी लढा देत आलो आहोत, आणि यापुढे आमचा लढा सुरुच राहणार असून उलट अधिक तीव्र होणार आहे. असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचचे राज्य युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केले.
शुक्रवारी पणजी येथे गोवा सुरक्षा मंचतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत फळदेसाइ बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस संदिप पाळणी, उत्तरगोवा सरचिटणीस अभय सामंत, बबन केरकर, विनायक च्यारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गो.सु.म तर्फे म्हादई आंदोलनाच्या विविध टप्यांमध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही ‘म्हादई जलसंपदा रथ यात्रा’ दि. 24 ते 30 जानेवारी 2018 दरम्यान आयोजित केली होती. सत्तरी-सुर्ला ते पणजी दरम्यान आम्ही यात्रा काढली व लोकांमध्ये जागृती निर्माण केली. दुसरा टप्यांत आम्ही ‘म्हादई बचाव आंदोलन’ केले. या दरम्यान आम्ही 12 तालुक्यांना भेट देऊन जागृती केली. तर तिसऱया टप्यांत दि. 3 ते 23 फेब्रुवारी 2020 दरम्यान गोव्यातील 300 गावांनी कलश पूजनाचा कार्यक्रम केले. आता यादेखील आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. असे फळदेसाई यांनी पुढे सांगितले.
म्हादईची स्थिती सरकारमुळे
आता जी म्हादईची स्थिती आहे ही राज्य सरकारच्या निश्काळजीपणामुळे आहे. जेव्हा कर्नांटक सरकारने बांधकाम करुन पाणी वळविले तेव्हा गोवा सरकारने हलगर्जीपणा केला. त्यावेळी त्यांनी आक्षेप घेत घेतला नाही. तसेच लवादासमोर ज्याप्रकारे बाजु मांडायची होती तेव्हा देखील मांडली नाही. मुख्यमंत्री जर म्हादई व गोव्याच्या लोकांविषयी गंभीर होते तर त्यांनी स्वतःह पुढाकार घेऊन सर्व पक्षांना एकत्रित करुन यावर मार्ग काढला असता पण ते देखील त्यांनी केले नाही. असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.
सरकारवर विश्वास नाही
सरकार ज्याप्रकारे सध्या राज्यात वावरत आहे हे पाहून सरकारवर विश्वास आता राहीलेला नाही. त्यामुळे लोकांनी एकत्रित येऊन म्हादईसाठी लढा द्यावा लागेल. तरच काही बदल होऊ शकतो. आता लववकरच आम्ही म्हादई आंदोलनाचा पुढचा टप्पा घेऊन येणार आहोत. असेही फळदेसाई यांनी सांगितले.