वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड येथील वरदविनायक युवक मंडळ, ग्रामस्थ व देणगीदारांच्या सहकार्यातून होळी गल्ली येथे बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचे उद्घाटन, लोकार्पण सोहळय़ाबरोबर होमहवन व विविध पूजनांचा संयुक्त कार्यक्रम शनिवारी झाला. देशावर ओढवलेल्या कोरोना महामारीचे भान ठेऊन हा कार्यक्रम अगदी साधेपणाने पार पडला.
ग्रामस्थ व देणगीदारांचे सहकार्य
श्री गणेश मंदिराचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीने साऱया देशाबरोबर गावोगावी सर्वसामान्यांचे जीवन मुश्कील करून सोडले होते. अशा परिस्थितीतसुद्धा श्रद्धेपोटी ग्रामस्थ व उदार देणगीदारांच्या सहकार्यातून ग्रामस्थांकडून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. कोरोना महामारी अजून आटोक्यात आलेली नाही, याचे भान ठेऊन ग्रामस्थांनी शनिवारी अगदी साध्या पद्धतीने मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पाडल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मूर्ती पंढरपूर येथून
नूतन गणेश मंदिरमधील मूर्ती पंढरपूर येथील कारागिराने बनविली असून शुक्रवारी बसवाण्णानगर येथून मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील व सदस्या अर्चना पठाणे यांच्या हस्ते गणपती मूर्तीचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीमध्ये सुहासिनी कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. ग्रामस्थही मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. रात्री 9 वाजता गणेश मंदिराजवळ मूर्ती आल्यानंतर गाभाऱयामध्ये विधिवत पूजन करून शुक्रवारी रात्री गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
शनिवारी सकाळी मंदिरमध्ये होमहवन-विविध पूजन
केपीसीसी सदस्य मलगोंडा पाटील यांच्या हस्ते मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते केतन पाटील यांच्या हस्ते सपत्निक मंदिर कळसारोहण पूजन करण्यात आले. निवृत्त जवान यादो पाटील यांच्या हस्ते गणहोम व वास्तुपूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
कोरोना महामारी हद्दपारसाठी साकडे
श्री गणेश मंदिर उद्घाटन व लोकार्पण सोहळय़ाप्रसंगी समस्त ग्रामस्थांच्यावतीने गेली दोन वर्षे देशात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. तिसऱया वर्षी ओमिक्रॉन या नवीन साथीने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. शासन करोडो रुपये खर्चून नागरिकांच्या संरक्षणासाठी रोगप्रतिबंधक मोफत लसी देऊन आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु दिवसेंदिवस ही साथ वाढतच आहे. यामुळे देवा आता तूच या देशाला सांभाळ, कोरोना महामारी व ओमिक्रॉन महामारी या साथींचा पूर्ण नायनाट करून पूर्वीसारखा बलशाली भारत देश तयार कर, अशी मागणी करत समस्त ग्रामस्थांच्यावतीने श्री गणपतीला साकडे घालण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरदविनायक युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक कार्यकर्ते भैरू सांबरेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले.