वार्ताहर/ कराड
शुक्रवारी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर रविवारी घरोघरे गौराईचे आगमन होत आहे. गौराई म्हणजे महिलावर्गाचा जीव की प्राण! अक्षरशः वर्षभर महिला लाडक्या गौराईची प्रतीक्षा करीत असतात. सलग दुसऱया वर्षीही कोरोनाचे संकट असल्याने सर्वच सण-उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. तरीही महिलांचा उत्साह कमी झाल्याचे दिसत नाही. महिला वर्गात गौराईच्या स्वागताच्या तयारीची लगबगही सुरू झाली आहे. शनिवारी दिवसभर कराडच्या बाजारपेठेत गौरीचे मुखवटे, दागिने व फराळाचे साहित्य खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती.
गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे व आनंदमय वातावरण आहे. रविवारी गौराईचे आगमन होत आहे. त्यासाठी महिलांची जय्यत तयारी सुरू आहे. शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गौरीचे मुखवटे व दागिने खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. गौरीचे आकर्षक मुखवटे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दीडशे रुपयांपासून पुढे मुखवटय़ांची किंमत आहे. तर साधारणतः सहाशे रुपयांपासून पुढे मुखवटय़ासह स्टॅण्ड व पूर्ण गौराई मिळत आहे. दत्त चौकापासून आझाद चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला मोठय़ा प्रमाणात गौराईच्या मुखवटय़ांचे स्टॉल लागले आहेत. तसेच भाजीमंडई परिसरातही मुखवटे व गौराईच्या दागिन्यांचे व सजावटीच्या साहित्याचे स्टॉल लागले आहेत.
गौराईचे मुख्य आकर्षण म्हणजे दागिने. गौराईच्या दागिन्यांनीही बाजारपेठ सजली आहे. ज्याप्रकारे महिला दागिने वापरतात, त्या सर्व प्रकारचे दागिने गौराईसाठी वापरून गौराईला सजवले जाते. शनिवारी दागिने खरेदीसाठीही महिलांची मोठी गर्दी झाली होती. कोल्हापुरी साज, बोरमाळ, नथ, कंबरपट्टा, किरीट, गजरे, मंगळसूत्र, डोर्ली, मोत्यांचे कंबरपट्टे, पोहेहार, मोतीहार, राणीहार, मोदक हार, मेकला, छल्ले आदी प्रकारचे दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
गौराईच्या समोर मांडण्यासाठी फराळाची मागणीही मोठी असते. धकाधकीच्या जीवनात महिला रेडिमेड फराळालाच जास्त पसंती देतात. याची दखल घेत शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये फराळांच्या पदार्थांची रेलचेल आहे. करंजी, रव्याचा लाडू, बेसन लाडू, बुंदीचा लाडू, चकली, शंकरपाळी, चिवडा आदी रेडिमेड फराळाचे पदार्थ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनापासुन काही अंशी दिलासा मिळाल्याने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तसेच गौराईच्या सणातही महिलांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच गणरायाच्या आगमनापासून पावसाने चांगली उघडीप दिल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी गौराईच्या सणात हळदी-कुंकवाच्या निमित्ताने महिला एकमेकींच्या घरी जाण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी मात्र ही परंपरा खंडित झाली होती. महिलांनी अगदी घरगुती पद्धतीने गौराईचा सण साजरा केला होता. त्या तुलनेत यावर्षी कोरोना व प्रशासनाकडून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने महिलांना गौराईच्या सणाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.