डांबरीकरणाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष : रस्त्याची दुर्दशा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना आवश्यक असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येते. शहरातील बहुतांश रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरवासियांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असलेल्या काकतीवेस ते ट्रेझरी कार्यालयाच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या आणि महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याची दुरूस्ती तसेच डांबरीकरण करण्यात येते. मात्र काही रस्त्याकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे. यामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, विविध न्यायालये, जिल्हा पंचायत कार्यालय, तालुका पंचायत कार्यालय, ट्रेझरी कार्यालय, नोंदणी कार्यालय, भूमापन कार्यालय, समाज कल्याण कार्यालय अशी विविध कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी संग्गोळी रायण्णा मुख्य रस्त्याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे चव्हाट गल्ली, कचेरी रोड, अशा दोन रस्त्यांचा वापर होतो. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तीन रस्ते अपुरे पडत आहेत. यामुळे काकतीवेसहून ट्रेझरी कार्यालयाकडे येणाऱया गंथालयाच्या शेजारील रस्त्याचा वापर वाहनधारक करीत असतात. यामुळे या रस्त्यावर वाहनधारकांची गर्दी वाढली आहे. मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
वाहनधारकांच्यादृष्टीने काकतीवेस ते ट्रेझरी कार्यालयापर्यंतचा संपर्क रस्ता महत्त्वाचा बनला असून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी सोयीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून तीन चाकी, दुचाकी वाहनधारकांची गर्दी मोठय़ाप्रमाणात होते. पण सध्या या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे. धर्मवीर संभाजी चौक व कॉलेज रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयाला जाण्यासाठी सरदार्स हायस्कूल मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने थेट ट्रेझरी कार्यालयापर्यत या रस्त्याने जाता येते. यामुळे रस्त्याची दुरूस्ती करून वाहनधारकांना हा रस्ता वापरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.