वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशात प्राण्यांवरील अत्याचाराची मनाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. राज्यातील पश्चिम गोदावर जिल्हय़ाच्या लिंगापालम गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सुमारे 300 श्वानांना विषारी इंजेक्शन देत मारून टाकले आहे. गावातील तलावानजीक खड्डा खोदून सर्व श्वानांना पुरण्यात आले आहे.
प्राणी अधिकार कार्यकर्ते चल्लापल्ली श्रीलता यांनी 29 जुलै रोजी पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार केल्यावर हे प्रकरण उजेडात आले आहे. त्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी ग्रामपंचायत सचिव आणि सरपंचाच्या विरोधात पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
श्वानांमुळे लोक होते त्रस्त
लिंगापालम गावातील लोक श्वानांमुळे त्रस्त होते. याचमुळे ग्रामपंचायतीने त्यांना मारून टाकण्याचा निर्णय घेतला. गावातील तलावानजीक श्वानांचे मृतदेह सडताना दिसून आल्याचे फाइट फॉर ऍनिमल्सच्या कार्यकर्त्या श्रीलता यांनी सांगितले आहे.