गावकीच्या राजकारणात भावकीचा वाद; राजकारणात अंधश्रध्देला खतपाणी
सागर लोहार / व्हनाळी
पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वेगळ्या वळणावर राजकारण येऊन ठेपले असून घरा घरातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत उमेदवार असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. गटातटाचे राजकारण बाजूला जाऊन गावकीत भावकीने जोर धरल्याने एकाच घरात दोन उमेदवारी तर स्थानिक गटात नेतृत्वावर नाराजी व्यक्त करण्यातसाठी प्रसंगी विरोधी गटाशी संगणमत करून सरपंच आपल्याच गटाचा करण्यासाठी खटाटोप सर्वच गटामधुन जाणवत असल्याचे चित्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवसापासुन दिसत आहे. काही गटाच्या युत्या आधीच ठरल्या होत्या त्याची आता फक्त प्रत्यक्षात अंमलबजावणी केली तर अनेक गटात आद्याप युत्या होणार की नाही असे चित्र पहायला मिळत आहे.
घराघरात शेजारा-शेजारील इच्छुकांनी उमेदवारी जाहीर केल्याने वेगळी स्थिती निर्माण झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाले असून प्रत्येक गटामध्ये स्थानिक पातळीवर दोन गट निर्माण झाल्याने ही निवडणूक चुरशीची लढली जात असली तरीसुद्धा सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर असल्याने सरपंच पदासाठीचा आर्थिक घोडे बाजाराला खिळ बसली तरी सरपंच पदाचे अपेक्षित आरक्षण कोणत्या प्रवर्गाला मिळणार यांचे ठोकताळे बांधुन गावागावात आता पासुनच निवडुन येणारा तगडा उमेदवार उभा करण्या पासुनच्या योजना चालु आहेत.
अनेक स्थानिक गटनेत्यांनी दुसऱ्या गटाशी युती केली असून त्याबद्दल राजकरणात अंधश्रद्धा म्हणून अनेकांनी परडी, अंगरा, भंडारा, गुलाल घेवून देवाला साक्षी ठेवत शपथ घेवून पुढील पॅनलच्या जोडणी घातल्या आहेत तर अनेकांनी जोतिषशास्त्रानुसार एकत्रित अर्ज भरण्याचा मुहुर्तही फिक्स करून ठेवला आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकातही कांही गटनेते अजूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
काही नेते मंडळींनी स्वतंत्र लढण्याचे आवाहन केले असले तरी स्थानिक ठिकाणी सोयीच्या युती झाल्या आहेत तर नेत्यांचा आदेश पाळणे हे देखील गरजेचे आहे पण उमेदवार शोधताना अनेक गटनेत्यांना दमछाक होत आहे. तसेच काही युवक भावकीतील हेवे दावे म्हणून पक्षातून उमेदवारी दिली तर ठिक नाहीतर अपक्ष उभे राहणारचं असा चंग युवकांनी बांधला आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणूकीत अपक्षांचीही अधिक भर पडणार आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सोशल मीडिया, मोबाईल, व्हाट्सअप मेसेज याचा वारेमाप वापर आता पासुनच सुरु आहे. त्यामुळे यावर्षीची ही पंचवार्षिक निवडणूक एका वेगळ्या वळणावर आणि वेगळ्या धर्तीवर होणार आहे यात तिळमात्र शंका नाही तालुक्यातील वरिष्ठ नेत्यानी स्थानिक पातळीवर स्थानिक गटाशी युती करण्याची मुभा दिल्याने आपल्या गटाचा सरपंच कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दिवसापेक्षा रात्रीचेच राजकिय खलबताना जोर धरु लागला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रंगत येणार असून माघारीनंतर उमेदवारांचे लढतीचे चित्र तालुक्यात स्पष्ट होईल असे दिसते.
राजकारणात असाही बदल….
गटा तटाशी चाळीस-पन्नास वर्षे निष्ठावंत असणाऱ्या व आपल्या नेत्यांचा आदेश शिरशावंद मानणाऱ्या ज्येष्ठांना हे सध्याच फुटा फुटीच राजकारण मानवणार नसलतरी बदलत्या राजकिय प्रवाहात त्यांना जुळवुन घेतलेल्या खेरीज गत्यंतर नाही. त्यामुळे निष्ठेचे राजकारण केल्यांना नवीन बदल स्विकारावा लागणर आहे.